ETV Bharat / state

Riots Plan in Pune: विवादित पोस्ट टाकून 'त्याला' घडवायची होती दंगल; अल्पवयीन बालकाला अटक

author img

By

Published : Apr 3, 2023, 4:46 PM IST

रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा याच संभाजीनगर येथील आहेर गावात पुन्हा दोन गटात हाणामारी झाली होती. यात एकाचा मृत्यू देखील झाला होता. असे झाले असताना पुण्यात देखील याच दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी एका अल्पवयीन बालकाकडून दोन गटात दंगल घडवून आण्यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करून ती पोस्ट डिलिट करण्यात आली आहे.

Riots Plan in Pune
दंगलीचा प्लॅन करणाऱ्यास अटक

पुणे : या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांच्या तक्रारीवरून पुण्यातील समर्थ पोलिसांकडून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील एका 14 वर्षीय मुलाने मच्छी मार्केटजवळ, लक्ष्मी रोड, नानापेठ पुणे याठिकाणी असताना स्वतःच्या आईच्या मोबाईल फोन वरून इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन समुदायात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट केली. पुण्यात दंगल घडावी हा त्यामागील हेतू होता. आपआपसात द्वेष निर्माण व्हावा या उद्देशाने या मुलाने वादग्रस्त फोटोसेशन केले होते. म्हणून त्याविरुद्ध सरकारतर्फे भादंवि कलम १५३.१५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दंगलबाजांची ओळख पटली : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपूरमध्ये दंगल उसळली. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या दंगलीच्या तपासासाठी १२ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे मुख्य तपास अधिकारी असून किराडपुरा दंगल प्रकरणाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. सात पथके २४ तास संशयितांचा शोध घेतील. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना अटक केली असून, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी ४० हून अधिक आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्हीची तपासणी : दंगलीदरम्यान आरोपींनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून तपास सुरू करण्यात आला आहे. शेकडो सीसीटीव्ही तपासून आणि त्याचे स्क्रिनशॉट्स घेऊन आरोपींची ओळख पटवली जाईल. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईल चॅट तपासले जात असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. दंगलीदरम्यान आरोपींनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. एवढेच नाही तर पोलिसांच्या वाहनांसह अन्य 14 वाहने जाळण्यात आली. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल केले. पहिल्या दिवशी सात आणि दुसऱ्या दिवशी चार जणांना अटक करण्यात आली. तिसऱ्या दिवशी आणखी 17 जणांना अटक केल्याचे समोर आले असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले.

हेही वाचा: Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींना दिलासा; जामिनात 13 एप्रिलपर्यंत वाढ, तर पुढील सुनावणी 3 मे रोजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.