नंदुरबार - जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील मुख्य प्रकल्प असलेला सुसरी धरण क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोमाई नदीला पूर आल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे व नदी परिसरात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील मुख्य प्रकल्प असलेल्या सुसरी धरणात ८० टक्के पाणीसाठा आहे. तर, धरणात येणाऱ्या नदीच्या उगम स्थळावर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुसरी धरणाचे तीन दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोमाई नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदी पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे, नदी काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - उंच गणेशमूर्तींची विक्री न झाल्याने मूर्तिकार अडचणीत, शासनाकडून मदतीची आस