ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचे कर्तुत्व काहीच नाही, ते केवळ नौटंकी करत आहेत - चंद्रशेखर बावनकुळे

author img

By

Published : May 2, 2023, 3:35 PM IST

काल महाविकास आघाडीची मुंबईत जाहीर वज्रमुठ सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बावनकुळे यांनी आगामी निवडणुकांपूर्वी भाजप नेतृत्वात बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसुला जाणार आहेत. अशी घोषणा त्यांनी वज्रमुठ सभेत केली. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'उध्दव ठाकरे हे नाटकबाज आहेत. ते नौटंकी करत आहेत. हा स्थानिकांसह सरकारचा प्रश्न आहे. ठाकरे यांची कोकणात शक्ती राहिलेले नाही, त्यामुळे त्यांची ही धडपड आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे निराश दिसत होते. त्यांनी त्यांचा भाषण लिहून देणारा बदलला पाहिजे. उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेबांचे नावचं घेऊ शकतात. उद्धव ठाकरेंचे कर्तुत्व काहीच नाही आणि ते अमित शहांना चॅलेंज करतात. कलम 370 रद्द केल्यावर याच उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचे अभिनंदन केले होते. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर बसून त्यांना चॅलेंज करत आहेत'.

मे महिन्यात संघटनेत बदल : नेहमीच इलेक्शन मोडवर असलेल्या भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील. त्या आधी भाजप नेतृत्वात बदल होणार आहेत, असे संकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे म्हणाले की, 'पक्षात दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारणीची पुनर्रचना होत असते. मी ऑगस्ट 2022 मध्ये अध्यक्ष झाल्यावर नवी कार्यकारणी अपेक्षित होती. आता उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांची नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे. आमचा 48 लोकसभा सीट आणि 200 हून अधिक विधानसभा सीट जिंकण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला यात यश मिळेल यादृष्टीने फेरबदल केले जात आहेत. जुनी आणि नवीन कार्यकारणी आणि मागच्या निवडणुका यात काहीचं संबंध नाही. 288 विधानसभा क्षेत्राचे समन्वयक लवकरच जाहीर करणार. मे महिन्यात संघटनेत बदल करण्यात येतील', असे बावनकुळे म्हणाले आहेत.

'अजित पवार उत्तर देतील' : बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात काय म्हटलं आहे आहे हे मला माहित नाही. मी पुस्तक वाचलेलं नाही. शरद पवारांनी काही टिप्पणी केली असेल तर अजित पवारांना याची माहिती असेल, ते उत्तर देतील. आम्ही काय उत्तर देणार? हा त्यांचा कौटुंबिक आणि पक्षाचा प्रश्न आहे.

उदय सामंत आणि शरद पवार भेट महत्त्वाची : उदय सामंत आणि शरद पवार भेटीबाबत बावनकुळे म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा मिळत असेल तर त्यांची भेट घेतली पाहिजे. विकासाच्या कामासाठी उदय सामंत शरद पवारांना भेटत आहेत'. तसेच बावनकुळे यांनी संजय राऊतांना कोकणातून नितेश राणे विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. गेल्या सरकारने चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली, वॉर्ड वाढवले, लोकसंख्या वाढवली. नवे सरकार आल्यावर सगळं व्यवस्थित केले. मात्र या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक कोर्टात गेले आहेत. कोर्टाचा निकाल आल्यावर आम्ही निवडणुकीत एकदा बघूनच घेऊ, असं बावनकुळे शेवटी म्हणाले.

हेही वाचा : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : बाबरी पडत होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते ते सांगावे- देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.