ETV Bharat / state

PM Modi Mumbai Visit : विकासाचे स्वप्न दाखवत पंतप्रधानांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

author img

By

Published : Jan 19, 2023, 8:03 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रोसह विविध नागरी प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता थेट विकासाचे स्वप्न दाखवत मुंबईकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देत मुंबईकरांनी सत्ता द्यायला हवी, असे आवाहन करीत पंतप्रधानांनी आगामी महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला जणू सुरूवातच केली.

PM Modi Mumbai Visit
PM Modi Mumbai Visit

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई विविध प्रकल्प आणि कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या विकासासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी आहेत असे सांगतानाच आपले सरकार हे विकासाचे सरकार आहे, येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी साद घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.


कशी घातली पंतप्रधानांनी मुंबईकरांना साद? मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांची साथ अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात मुंबईचा विकास झाला नाही. केवळ कामे रखडवण्याची भूमिका घेतली गेली असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत जर सत्ता असेल तर अधिक कामे होतील, असा दावा करीत मुंबईकरांना अप्रत्यक्षरीत्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाच्या सोबत उभे राहण्याचे आवाहन केले. मुंबईत अडतीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे मुंबईकरांच्या विकासाचे स्वप्न हळूहळू पूर्ण होत आहे आणि हे केवळ डबल इंजिन सरकार म्हणजेच शिंदे फडणवीस यांच्यामुळे होत आहे आधीच्या सरकारने काहीही काम केले नाही त्याचा फटका मुंबईकरांना बसतो आहे असा अप्रत्यक्ष दावाही त्यांनी केला.

मुंबईकरांना पैसा कमी पडू देणार नाही - मुंबईच्या विकासकामांसाठी डबल इंजिन सरकार नक्कीच मेहनत घेईल त्यासाठी मुंबईत भाजपा शिंदे गटाची सत्ता असायला हवी असे म्हणत महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंगच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने फुंकले आहे. भाजप आणि एनडीए कधीही विकास कामांना ब्रेक लावत नाही मात्र गेल्या काही काळात विकास कामांना ब्रेक लावला गेला मुंबईतील छोटे व्यावसायिक फेरीवाले यांच्यासाठी असलेला स्वनिधी तत्कालीन सरकारने रोखला होता आणि म्हणूनच सव्वा लाख लाभार्थी त्यापासून वंचित राहिले असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.

नाव न घेता ठाकरे कुटुंबीयांवर टीका - पंतप्रधानांनी आपल्या विकासाच्या मुद्द्यावर भाषणाचा रोख ठेवला असला तरी अधून-मधून महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाव न घेता त्यांनी प्रहार केले. ठाकरे कुटुंबीयांचे नाव न घेऊन त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करीत दुसरीकडे विकासाचे काम रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचे भविष्य कसे उज्वल होईल असा टोलाही त्यांनी लगावला.

डबल इंजिन सरकारचा वारंवार पुनरुच्चार - शिंदे आणि फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारने राज्यात आणि विशेषतः मुंबईत मोठ्या विकास कामांना सुरुवात केली आहे त्यामुळे या डबल इंजिन च्या सत्तेवरच जनतेने विश्वास ठेवायला पाहिजे तरच भविष्यकाळात मुंबईचा कायापालट होईल असे स्वप्न दाखवत आगामी निवडणुकांच्या प्रचाराची पायाभरणीच या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - CM Eknath Shinde on MVA : तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार; महाविकास आघाडीवर मुख्यमंत्र्यांची सडकून टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.