ETV Bharat / state

Barti Students Fellowship: बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप; विद्यार्थ्यांच्या ५२ दिवसांच्या आंदोलनाला यश

author img

By

Published : Apr 13, 2023, 10:50 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.तब्बल 51 दिवसांनंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे.

Barti Students Fellowship
बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप

मुंबई: बार्टीअंतर्गतची फेलोशिप मिळावी, यासाठी ८६१ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण पुकारले. आझाद मैदानात उन्हाच्या कडाक्यात आंदोलन करत सरकारला जेरीस आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथीगृह येथे भेटीसाठी बोलावले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. दरम्यान सारथी, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




फेलोशीपसाठी समान धोरण तयार: मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपसाठी एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी फेलोशिपसह अन्य मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी मागणीची दखल घेत, विद्यार्थ्यांना दिलासा दिला. तसेच, फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार: दिव्यांग तसेच गावोगावी राहणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना असावी. राज्यात बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर घरेलु कामगार यांच्यासाठी मंडळ करण्याची मागणी, आमदार बच्चू कडू यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. सहकार मंत्री अतुल सावे, राजकुमार पटेल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


संबंधित विभागाला दिले निर्देश: मुख्यमंत्री शिंदे यांनी, स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी, असे निर्देश संबंधित विभागाला दिले. शेतमजुरांसाठी योजना करण्याबाबतच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा केली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक सुरू आहे. त्या कामाला वेग द्यावा, यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे संपर्क साधला. अचलपूर जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, माधान चांदूरबाजार येथे शासकीय सिट्रस इस्टेट करणे, फीन ले मील पुर्ववत सुरू करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या.

हेही वाचा: Babasaheb Ambedkar Jayanti बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्टीतर्फे घर घर संविधान योजना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.