मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलावले होते. शिवसेनेचे १९ पैकी १5 खासदार हजर तर 4 खासदार अनुपस्थित होते. एनडीएचे उमेदवार दौपद्री मुर्मु यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका सर्व खासदारांनी मांडली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली. राऊत आणि इतर खासदारांमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राऊतांच्या भूमिकेमुळे गटबाजी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष विरोधात बंडखोरी करत भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला आहे. खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत गटबाजी झाली, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. आता राऊत खासदारांच्या निशाण्यावर आले आहेत. मातोश्रीवरच्या बैठकीत संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदारांमध्ये वाद रंगला. यानंतर राऊत यांनी मातोश्री बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांशी न बोलता निघून गेले. त्यामुळे संजय राऊत आणि खासदारांचा वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पाठिंब्यासाठी दबाव: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार करत आहेत. त्यासाठी ठाकरेंवर खासदारांचा दबाव वाढत आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारां पाठोपाठ खासदारांनी बंड केल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक झाली. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीला किती खासदार: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 4 खासदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय बैठकीत होणार होता. आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यातच खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे खासदाराही खरेच बंड करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे खासदार उपस्थित : उपस्थित खासदारांमधे गजानन कीर्तिकर - उत्तर मुंबई, अरविंद सावंत - मुंबई दक्षिण, विनायक राउत - रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धैर्यशील माने - हातकणंगले, हेमंत गोडसे - नाशिक, राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई, श्रीरंग बारणे - पिंपरी चिंचवड, प्रताप जाधव - बुलढाणा, सदशिव लोखंडे - शिर्डी, ओमराजे निंबाळकर- उस्मानाबाद, राजेंद्र गावित- पालघर,
राजन विचारे - ठाणे, ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांची बैठकीला हजेरी होती.
हे खासदार अनुपस्थित: गैरहजर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम - भावना गवळी, परभणी - संजय जाधव, कोल्हापूर - संजय मांडलिक, हिंगोली - हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे, रामटेक - कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर यांचा समावेश होता. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे. तुमाने यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला होता तसेच मी दिल्लीत नव्हतोच असे म्हणले होते.
हेही वाचा : Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'