ETV Bharat / state

CSMT Kurla Railway Track : बारा वर्षे रखडलेल्या 'या' रेल्वे मार्गाच्या कामात साडेतीनशे कोटींची वाढ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 4:26 PM IST

CSMT Kurla Railway Track : मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला यामध्ये रेल्वेच्या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचं काम गेल्या बारा वर्षांपासून रखडलंय. या मार्गात अनेक घरे येत असल्यानं अडथळा निर्माण झालाय. मात्र, त्यामुळं या कामाची किंमत आता आणखी साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय.

CMST Kurla Railway Track
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला

मुंबई CSMT Kurla Railway Track : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे उपनगरीय रेल्वे गाड्यांचं स्थानक अत्यंत गजबजलेलं असतं. मध्य रेल्वेवर प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळं प्रवाशांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देता याव्यात आणि कमी वेळेत सुकर प्रवास व्हावा, यासाठी मध्य रेल्वेनं पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या रेल्वे स्थानकादरम्यान करण्याचा निर्णय 2010 मध्ये घेतला होता. या निर्णयाला तब्बल बारा वर्षे झालीत. तरी अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळं आता या कामाची किंमत सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढली आहे, असं मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय.


काय आहे प्रकल्प : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सध्या उपनगरीय गाड्यांसाठी चार मार्गिका वापरल्या जात आहेत. मार्गिका क्रमांक एक, दोन या मार्गिकांवरून धीम्या गाड्या धावतात, तर मार्गिका क्रमांक तीन आणि चारवरून जलद गाड्या धावत असतात. कुर्ला ते कल्याण दरम्यान पाच आणि सहा क्रमांकाची मार्गिका आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची मार्गिका नसल्यानं उपनगरीय गाड्यांसोबतच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या चालवण्यावर अडचणी येत होत्या. या दृष्टीनं विचार करून 2010 मध्ये एमएमआरबीसीच्या माध्यमातून एमयुटीपी दोन या प्रकल्पांतर्गत कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तेव्हा प्रकल्प खर्च सुमारे 537 कोटी रुपये आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आला. मात्र, अद्यापही या मार्गीकेचं काम सुरू न झाल्यानं प्रकल्प खर्चात मोठी वाढ झालीय. आता हा खर्च 890 कोटी रुपयांवर पोहोचलाय.


निवासी इमारतींचा अडथळा : दरम्यान या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रस्तावित आराखड्यात काही ठिकाणी निवासी इमारती येत आहेत. हे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडलंय. वास्तविक मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांनी एमयूटीपी दोन अंतर्गत या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या मुंबईत एमयूटीपी तीन अंतर्गत अनेक प्रकल्प सुरू झाले असले, तरी हा एमयूटीपी दोन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला प्रकल्प अद्यापही सुरू झाला नाही. या मार्गिकेमध्ये अडथळा ठरणाऱ्या निवासी घरांबाबत सरकारनं अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं हा प्रकल्प रखडला आहे, जर या निवासी घरांना कोणताही धक्का न लावता प्रकल्प साकारायचा असेल तर पुन्हा एकदा रेल्वेच्या जागेत उन्नत मार्ग तयार करावा लागेल. मात्र, त्यासाठी मोठा खर्च येणार असल्यानं सध्या तरी याबाबतचा प्रस्ताव तयार केला गेलेला नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Garib Rath Express News : नागपूरहून निघालेली गरिब रथ एक्स्प्रेस पुण्याला पोहोचलीच नाही; प्रवाशाच्या पत्नीचा दावा
  2. Robbery In Jammu Tawi Express : संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवासी जखमी
  3. Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे ३ ते ४ तास लेट; चाकरमान्यांचे हाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.