ETV Bharat / state

Sharad Pawar Book On BJP Conspiracy: भाजपचा शिवसेनेविरुद्धचा 'तो' धक्कादायक 'प्लान' शरद पवारांच्या पुस्तकातून होणार उघड

author img

By

Published : Apr 30, 2023, 6:14 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती', या पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात शिवसेना संपवणे, हाच भाजपचा हिशेब होता असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

Sharad Pawar Book On BJP Conspiracy
शरद पवार

मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये 2014 नंतर दरी निर्माण झाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद वाढले. शरद पवारांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून महाविकास आघाडीचा जन्म, शिवसेना-भाजपमधील संघर्षावर भाष्य केले आहे. भाजपने राबवलेल्या 'ऑपरेशन लोटस'वर हल्लाबोल करताना, शिवसेना संपवण्यासाठी आणि स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पुस्तकात केला आहे.


भाजपला शिवसेनेची अडचण​​: कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला शिवसेनेची अडचण होत होती. महाराष्ट्रात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शहरी, ग्रामीण भागातून तिचे उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व मिळवता येणार नाही. त्यासाठी शिवसेना संपवल्याशिवाय स्वबळावर सत्ता येणार नाही, असा चंग भाजपकडून बांधण्यात आला. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शिवसेनेला 'डॅमेज' करण्याचा वारंवार प्रयत्न झाला. पुढे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेबाबत बिलकुल सहानुभूती उरली नव्हती. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपांपासून स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी भाजपने खटाटोप केली. शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार असलेले नारायण राणे यांना भाजपमध्ये विलीन करून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले, असा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.



बंडखोरांना भाजपचे पाठबळ?: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पन्नास उमेदवारांना बंडखोरीचे आवाहन होते. बहुतांश बंडखोरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने पाठबळ मिळाल्याचे दिसत होते. भाजप आपल्या अस्तित्वावर उठला आहे, असा संताप शिवसेना नेत्यांमधून व्यक्त केला जात होता; परंतु सत्तेत आल्यामुळे उद्रेक झाला नाही. मात्र, अंतर्गत आग धुमसत होती, असा दावा शरद पवार यांनी पुस्तकातून केला.


पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन: राकॉं अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे येत्या 2 मे रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रकाशन होणार आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या वितरण सोहळ्याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Building Collapsed in Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यत सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी मदतकार्य सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.