ETV Bharat / city

Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्लांकडून राऊत, खडसेंचा 127 वेळा फोन टॅप?

author img

By

Published : Apr 11, 2022, 6:56 PM IST

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये (Colaba Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे की त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे 127 वेळा फोन टॅप करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

rashmi shukla
रश्मी शुक्ला

मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये (Colaba Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे की त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे 127 वेळा कॉल रेकॉर्ड करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात कुलाबा पोलिसांकडून रश्मी शुक्ला यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. तसेच एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचादेखील जवाब नोंदवण्यात आला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता, तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे फोन टॅपिंग प्रकरणात रश्‍मी शुक्‍ला यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

कोणाचे कितीवेळा फोन टॅप झाले - या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पहिल्यांदा झालेल्या फोन टॅपिंगच्या प्रकारात सात दिवस फोन टॅपिंग करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग हे एसडीआयच्या स्वरूपात करण्यात आल्याची कबुली कुमार यांनी आपल्या जबाबात दिली आहे. संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला. तसेच एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

वळसे पाटील यांनी दिली होती माहिती - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच कुणाकुणाचे फोन टॅप झाले होते याची माहिती जाहीर केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितले होते. रश्‍मी शुक्‍ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्‍मी शुक्‍ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती वळसे पाटील यांनी दिली होती.

काय आहे प्रकरण?- राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रश्मी शुक्लाांविरोधात पुण्यात गुन्हा - रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.