ETV Bharat / city

Political Analysis : उत्तर प्रदेश निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायेत का?

author img

By

Published : Nov 18, 2021, 8:07 PM IST

Updated : Nov 18, 2021, 8:57 PM IST

महाराष्ट्रातील हिंसाचाराचे(Amravati Violence) पडसाद होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जाणवतील. तसेच उत्तर प्रदेशमध्ये(UP Election) होणाऱ्या निवडणुकीत हिंसाचार विषयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतील, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

file photo
फाईल फोटो

मुंबई - त्रिपुरातील(Tripura Violence) कथित घटनेवरून राज्यात अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये हिंसाचार(Amravati Violence) झाला होता. या हिंसाचाराचे पडसाद होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जाणवतील. तसेच उत्तर प्रदेशमध्ये(UP Election) होणाऱ्या निवडणुकीत हिंसाचार विषयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतील, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेवरून राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगाव याठिकाणी मोर्चे निघाले. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने या तिन्ही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासोबतच अमरावतीमध्ये परिस्थिती जास्तच गंभीर झालेली पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये एका समाजाच्या मोर्चानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. यावेळीही या भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचाराबाबत भाजपचे आमदार अनिल बोंडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

  • हिंसाचाराचा निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न -

नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये घडलेल्या दंगलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्ष नक्की उचलणार. खास करून भाजपकडून अशा घटनांचा बाऊ निवडणूकांमध्ये केला जातो. त्यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या इतर राज्यांच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका असतील, यामध्ये राज्यात घडलेल्या हिंसक घटनांचा उल्लेख करून मत मागण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत राजकीय विश्लेषण अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

  • राज्यातील अशांतते मागे राजकारण -
    nawab malik twitt
    नवाब मलिक यांचे ट्विट

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचा महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे पडसाद उमटणे याला काही राजकीय कडा असल्याची शंका थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. काही महिन्याने उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्रिपुरामध्ये जी गोष्ट घडलीच नाही त्याबद्दल राज्यांमध्ये अशांतता पसरवण्याचे काम काही लोकं करत असल्याची शंका शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच अमरावतीमध्ये अशांतता पसरवण्याचा आरोप रझा अकॅडमीवर होता. त्या रझा अकॅडमीमध्ये असा प्रकार करण्याची ताकत नाही. त्यामुळे या सर्व घटनांच्या मागे इतर कोणाचा तरी हात असल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील व्यक्त केला आहे. तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप जारी करून, या घटनेमागे भाजप असल्याचा दावा केला आहे.

  • रझा अकॅडमी आघाडी सरकारचे पिल्लू-

याउलट अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसक घटनेच्या मागे रझा अकॅडमी असून, रझा अकॅडमीला महाविकास आघाडी सरकारनेच खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे रझा अकॅडमीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी
  • होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपचे राजकारण -

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. राज्यात निवडणुका आल्यास भाजप हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने हेतूपुरस्पर अशांतता पसरवण्याचे काम केले असल्याचे अबू आझमी म्हणाले आहेत.

Last Updated : Nov 18, 2021, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.