ETV Bharat / city

मुंबई पोलीस करणार समीर वानखेडेंची चौकशी; चार तपास अधिकाऱ्यांचे नावे जाहीर

author img

By

Published : Oct 28, 2021, 9:08 AM IST

एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे.

Mumbai Police will investigate sameer khan
Mumbai Police will investigate sameer khan

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Mumbai Police latest news
परिपत्रक

समीर वानखेडेंच्या चौकशीची घोषणा -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. प्रभाकर साईल, ऑड सुधा द्विवेदी, ऑड कनिष्का जयंत आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ -

दरम्यान, समीर वानखेडेंच्या सुरक्षेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वाढ केली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. समीर वानखेडेंनी आपल्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

प्रभाकर साईलचे आरोप काय -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साईलनी सांगितले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

हेही वाचा - एनसीबी पथकाकडून समीर वानखेडेंचा चार तास जवाब नोंदवला, मात्र तक्रारदार गायब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.