ETV Bharat / city

World Environment Day : आपली पृथ्वी एकटीच, तिला वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य - प्रा. डॉ. जयंत वडतकर

author img

By

Published : Jun 5, 2022, 10:13 AM IST

Updated : Jun 5, 2022, 11:53 AM IST

संयुक्त राष्ट्र संघाकडून 1973 सालापासून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस ( World Environment Day ) साजरा करण्यात येतो. पर्यावरणाच्या समस्यांची चर्चा करून त्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा यामागील हेतू आहे. पर्यावरण दिवसाची दरवर्षी एक थीम ( World Environment Day Theme ) ठरविण्यात येते. त्यानुसार यावर्षी पर्यावरण दिवसाची थीम 'ओन्ली वन अर्थ' अर्थात 'आपली पृथ्वी फक्त एकटीच आहे' अशी ठेवण्यात आली आहे.

World Environment Day
World Environment Day

अमरावती - संयुक्त राष्ट्र संघाकडून 1973 सालापासून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस ( World Environment Day ) साजरा करण्यात येतो. पर्यावरणाच्या समस्यांची चर्चा करून त्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा यामागील हेतू आहे. पर्यावरण दिवसाची दरवर्षी एक थीम ( World Environment Day Theme ) ठरविण्यात येते. त्यानुसार यावर्षी पर्यावरण दिवसाची थीम 'ओन्ली वन अर्थ' अर्थात 'आपली पृथ्वी फक्त एकटीच आहे' अशी ठेवण्यात आली आहे. पृथ्वीला वाचविणे हे आपले कर्तव्य आहे, असा संदेश या थीम मधून देण्यात आला आहे. बदलत्या हवामानाबाबत सर्वांनीच जागृत राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. जयंत वडतकर पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

प्रतिक्रिया

वातावरण बदलाचा थेट मानवी जीवनावर परिणाम - आज पृथ्वीवरील वातावरण बदलत चालल्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधता लोप पावत चालली आहे. वातावरणातील बदल आणि जैवविविधता यांचा परस्पर संबंध आहे. लोप पावत जाणाऱ्या जैवविविधतेचा थेट परिणाम मानवी जीवनावर पडणार असून मानवाच्या मूलभूत गरजा जसे पाणी, अन्न, प्राणवायू याचा भविष्यात तुटवडा निर्माण होऊन मानवी जीवन संकटात सापडण्याची दाट भीती आहे. त्याची सुरुवात यापूर्वीच झालेली आहे. आज मानवाच्या अन्नधान्यातील विविधता हळूहळू लोप पावत चालल्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर पडतो आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढीसाठी वापरले जाणारे किटकनाशक व रासायनिक खते यामुळे आपण आज विषयुक्त अन्न खात असल्यामुळे मानवात आज कर्करोगासारख्या आजारांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे covid-19 सारख्या संसर्गामुळे संपूर्ण जगाला मानवी जीवन संपुष्टात येण्याबद्दल एक झलक बघण्यास मिळाली असल्याचेही प्राध्यापक डॉ. जयंत वडतकर म्हणाले.

पिण्यायोग्य पाण्यावर परिणाम - पृथ्वीवर गत दोन दशकांत झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे व अलीकडे वाढत्या वाहन संख्येमुळे तसेच भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या नादात नैसर्गिक स्त्रोतांचा अमर्याद उपसा केल्यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. अति प्रमाणात कार्बन उत्सर्जनामुळे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होऊन पृथ्वीचे तापमान वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीवर असलेले पिण्यायोग्य गोड पाण्याचे साठे म्हणजेच उत्तर ध्रुवावरील बर्फसाठा व हिमालयाच्या कुशीतील हिमनद्या वितळण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असल्याने गोड पाण्याचा साठा संपत आहे. जमिनीतील पाण्याचा साठा अतिउपसा करून संपत चालला असल्याने भविष्यात संपूर्ण जीवसृष्टीसाठी पाणी हे सर्वात मौल्यवान घटक ठरणार असल्याचेही डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.

पृथ्वीची जीवनदायिनी क्षमता संकटात - आज मानव जातीत समोर अनेक गंभीर समस्या असल्या तरी या सर्व समस्यांमधून एक सार्वत्रिक समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे पृथ्वीची जीवन दैनिक समता हीच संकटात सापडली आहे. पृथ्वीची जीवनदायिनी क्षमता संकटात सापडल्यामुळे मागील लाखो वर्षांपासून पृथ्वीवर जी जैवविविधता निर्माण झाली, वाढली आणि त्याची उत्क्रांती होत गेली आणि आजचे पृथ्वीवरील चित्र निर्माण झाले. ते सर्वच आता धोक्यात आले आहे. गेल्या दोन-तीन शतकातील मानवाच्या पृथ्वी सोबतच्या व्यवहारामुळे तिची जीवन देण्याची क्षमता नष्ट होत चालली आहे. यामुळेच हवामान बदलाकडे आता गांभीर्याने बघण्याची गरज असून पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जीवन संकटात सापडणार आहे. याबाबत आत्ताच सर्वांनी जागृत होणे ही काळाची सर्वात मोठी गरज असल्याचेही प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Uddhav Thackeray On Kashmiri Pandit Issue : काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

Last Updated : Jun 5, 2022, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.