नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. प्रशासनाने कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याला काश्मीरमध्ये जाऊ दिले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यास आज (शनिवारी) जाणार आहेत. मात्र, काश्मीर प्रशासनाने विरोधी पक्षांना भेट न देण्याचे आवाहन केले आहे.
काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात येत असून विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षाच्या शिष्ठमंडळामुळे काश्मीरमध्ये लागू असलेल्या संचारबंदीचेही उल्लंघन होईल, असे जम्मू प्रशासनाने म्हटले आहे.
राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे शिष्ठमंडळ काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यास आज (शनिवारी) जाणार आहेत. तसेच काश्मीरमधील स्थानिक नारिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र, काश्मीर प्रशासनाने शुक्रवारी रात्री निवेदन जारी केली. तसेच माहिती प्रसारण विभागाने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन विरोधी पक्षांना केले आहे. श्रीनगरला भेट दिल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे भेट देऊ नका, असे काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शनिवारी ९ विरोधी नेत्यांसह काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा ही ज्येष्ठ नेते मंडळी असणार आहेत.