महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole Reaction: महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली, राष्ट्रपती राजवट लावा- नाना पटोले यांची मागणी

By

Published : Jul 13, 2023, 6:09 PM IST

राज्यात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे ते बघता महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला अलीबाबा चाळीस चोर कथेची आठवण होत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. जनतेच्या प्रश्नाशी काहीही घेणे देणे नसणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली. असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole Reaction
नाना पटोले यांची मागणी

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

नागपूर : भाजपचे १०५ आमदार जनतेने निवडून दिले, ते आता जनतेचे पैसे लुटत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवृत्तांना काम तर बेरोजगारांवर कुऱ्हाड : राज्य सरकारने एक सुलतानी जीआर काढला आहेत. त्यात निवृत्त शिक्षकांना २० हजाराच्या मानधनावर रिक्त पदी भरती करण्यात येणार आहे. म्हणजे बेरोजगार तरुणांवर एकप्रकारे कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवृत्तांना कामावर लावून तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे.



राष्ट्रपती शासन लागले पाहिजे :महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी, नाना पटोले यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपामध्ये मलाईदार खाते कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू आहे. एकीकडे राज्यातील जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने राज्यपाल, राष्ट्रपती यांनी लगेच हस्तक्षेप केला पाहिजे. विरोधकांना भीती दाखवून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे तातडीने कारवाई झाली पाहिजे असे नाना पटोले म्हणाले.


सरकार आता मायबाप राहिलेले नाही: मंत्रिमंडळात कुणाला कोणते मंत्रिपद मिळेल याच्याशी जनतेला काहीही देणे घेणे नाही. सरकार आता मायबाप राहिलेले नाही, हे जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत. पावसाची मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली टीम तयार करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे व लुटायचे काम सुरू आहे.


महाराष्ट्राला भाजपने कलंक लावला: राज्यात कलंक शब्दाचा विषय निघाला आहे. महाराष्ट्राला भाजपने कलंक लावून ठेवलेला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू करण्याबद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन देणार असल्याचे पटोले म्हणाले.



विरोधीपक्ष नेते पदावर काँग्रेसचा दावा: सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र देईल. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा विरोधी पक्ष होतो ही सिस्टम आहे. आता दोन्ही सभागृहात काँग्रेसकडे जास्त आमदार आहेत. महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तो चर्चा करू.



राहुल, प्रियांका, खरगे यांच्या सभा होतील : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पूर्ण राज्यात सहा विभागात किमान दोन-दोन सभा झाल्या पाहिजे. पहिल्या टप्प्यात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगे यांच्यात सभा होतील, अशी माहिती पटोले यांनी दिली.



महाराष्ट्र असा कधीच नव्हता : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. काँग्रेस कधी असे करत नाही, असा महाराष्ट्र कधी नव्हता. भारतीय जनता पक्षानेच असा महाराष्ट्र तयार केला असा आरोप, पटोले यांनी केला आहे.



शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल: सव्वा वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही. एक मंत्री सहा-सहा जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदी नियुक्त आहे. शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल. कायमस्वरूपी पालकमंत्री असते तर तातडीने आढावा घेतला असता.



छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान काँग्रेसचं जिंकेल : तेलंगणात आता काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे चित्र आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान हे सगळे राज्य काँग्रेस पक्ष जिंकणार असा दावा पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Political crisis in NCP : शिंदे, पवारांच्या स्क्रिप्ट भाजप मुख्यालयातूनच, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
  2. Congress Leaders Meeting: महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू, पक्षांतर्गत गटबाजीसह विरोधी पक्षनेता निवडीवर चर्चा होणार?
  3. Nana Patole : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागेल; काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details