महाराष्ट्र

maharashtra

पंकजा मुंडे बंडाच्या पवित्र्यात..?, केवळ राष्ट्रीय नेतृत्व मान्य करणाऱ्या पंकजांचे राज्यात धुसफूस

By

Published : Jul 14, 2021, 5:23 PM IST

राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांना रस आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात त्या सक्रिय नसल्याचे चित्र आहे. नुकतेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली. पण, आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

मुंबई -मी राष्ट्रीय स्तरावर काम करते, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे आहेत, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांची मनधरणी करताना केले. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षातील राज्यातील नेतृत्व पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी राज्याच्या नेतृत्वाबद्दल बंड पुकारल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिस्तप्रिय भारतीय जनता पक्ष पंकजा मुंडे यांच्यावर कारवाई होणार का, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याचे टाळले

आपण राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. त्यामुळे आपले नेते हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत असे सांगत असताना पंकजा मुंडे यांनी कटाक्षाने राज्यातील नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणे टाळले आहे. मात्र, नाराज समर्थकांचे राजीनामे आणि त्या नाराज समर्थकांची पंकजा मुंडे यांनी काढलेली समजूत ही भारतीय जनता पक्षावर पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेले दबावतंत्र असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडला आहे. सध्या राज्यातील भारतीय जनता पक्षाची एक हाती सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. पंकजा मुंडे यांनी असाच आक्रमक पवित्रा ठेवला तर, येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना नमत घेण्याच्या सूचना करण्याची शक्यता असण्याचे मत अजय वैद्य यांनी व्यक्त केले.

योग्य वेळी घेणार निर्णय

राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांना रस आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात त्या सक्रिय नसल्याचे चित्र आहे. नुकतेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली. पण, आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडेंसमोर शिवसेनेचा पर्याय - विश्लेषक

केंद्रीय नेतृत्वावर आपले पूर्ण विश्वास असून येणाऱ्या काळात आपल्याबरोबर न्याय होईल, अशी आशा पंकजा मुंडे यांना आहे. मात्र, ज्यावेळी पंकजा मुंडे यांना आपल्या सोबत न्याय होणार नाही, असे वाटेल त्यावेळी पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा निर्णय घेण्याची वेळ पंकजा मुंडे यांच्या वर आलीच तर, शिवसेना पक्षाची दारे त्यांच्यासाठी नेहमीच उघडी असल्यामुळे शिवसेनेचा पर्याय पंकजा मुंडे येणाऱ्या काळात निवडू शकतील, असेही मत विश्लेषकांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण केले- नाना पटोले

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षातील ओबीसी नेत्यांचे खच्चिकरण करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षातील ओबीसी नेते पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना डावळण्याचा पूर्ण प्रयत्न देवेंद्र फडणीस यांच्याकडून करण्यात आला असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -राज्यातील निर्बंध होणार शिथिल; टास्क फोर्स समितीचा अहवाल सादर

ABOUT THE AUTHOR

...view details