महाराष्ट्र

maharashtra

हतनूर धरणात निम्म्यापेक्षा अधिक गाळ; गाळ काढण्यासाठी प्रस्तावित वक्राकार दरवाजांचे कामही कासवगतीने

By

Published : Jul 31, 2021, 6:39 PM IST

तापी व पूर्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे या धरणात सातत्याने गाळ साचत आहे. सद्यस्थितीत हे धरण निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच ५४ टक्के गाळाने भरले आहे. धरणातील गाळ काढण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने धरणातील गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे.

जळगाव- भुसावळ तालुक्यात हतनूर येथे तापी नदीवर असलेले हतनूर धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. मात्र, तापी व पूर्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे या धरणात सातत्याने गाळ साचत आहे. सद्यस्थितीत हे धरण निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच ५४ टक्के गाळाने भरले आहे. धरणातील गाळ काढण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने धरणातील गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी धरणातील गाळ काढण्यासाठी ८ विस्तारित वक्राकार दरवाजांची उभारणी प्रस्तावित आहे. मात्र, हे कामही गेल्या १० वर्षांपासून पूर्णपणे खोळंबले आहे.

गाळ काढण्यासाठी प्रस्तावित वक्राकार दरवाजांचे कामही कासवगतीने

नाशिकच्या 'मेरी' संस्थेने केले होते सर्वेक्षण-

हतनूर धरणात गाळ साचत असल्याने स्पष्ट झाल्यानंतर धरणात नेमका किती गाळ आहे, याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने काही वर्षांपूर्वी नाशिक येथील 'मेरी' संस्थेच्या माध्यमातून दूरसंवेधी यंत्रणेद्वारे (सॅटेलाईट) सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली होती. धरणाच्या पाणी साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी देखील धरणातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत.

वक्राकार दरवाजांचे कामही कासवगतीने

तर ही वेळ आलीच नसती-

हतनूर प्रकल्पाची उभारणी गेल्या ३५ वर्षांपूर्वी झालेली आहे. हतनूर धरणाची पाणी साठवण क्षमता ३८८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमीटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून ही चिंतेची बाब आहे. धरणातील गाळ वेळीच उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती, असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे गाळ काढण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.

म्हणून साचतो धरणात गाळ-

मध्यप्रदेशातून उगम पावून महाराष्ट्रात वाहणारी तापी नदी आणि विदर्भातून वाहणारी पूर्णा नदी, हतनूर धरणासाठी दोन प्रमुख पाण्याचे स्त्रोत आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येतो. तो हतनूर धरणात साचतो. पूर्णा ही नदी राज्यातील सर्वाधिक गाळ वाहून आणणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. पूर्णातून हतनूरमध्ये सर्वाधिक गाळ येतो. वर्षानुवर्षे गाळ काढलाच गेला नसल्याने धरणात गाळाचे प्रमाण वाढले आहे.

गाळ काढणे शक्य नाही-

धरणातील गाळाच्या विषयाबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन म्हणाले की, हतनूर धरणात आजमितीला सुमारे ५४ टक्के इतका गाळ आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. गाळ काढायचा असेल तर धरण दोन ते तीन वर्षे संपूर्ण कोरडे करावे लागेल. ते शक्य नसल्याने हा गाळ कसा काढता येईल. हतनूर धरणातील पाणी हे बिगर सिंचन संस्थांसाठी आरक्षित असते. त्यामुळे गाळ असला तरी पाणी साठा सहज पुरतो, असे शाखा अभियंता महाजन यांनी सांगितले.

वक्राकार दरवाजे उभारणी रखडली-

हतनूर धरणातील गाळाचे सहज उत्सर्जन होण्यासाठी ८ विस्तारित वक्राकार दरवाजांची उभारणी प्रस्तावित आहे. मात्र, हे काम गेल्या १० वर्षांपासून खोळंबले आहे. धरणाच्या डाव्या बाजूला उभारले जाणाऱ्या आठही वक्राकार दरवाजांची उत्सर्जन पातळी दीड ते दोन मीटरने खाली आहे. या दरवाजांच्या माध्यमातून पावसाळ्यात धरणातील गाळ पुराच्या पाण्यासोबत वाहून जाऊ द्यावा, अशी त्याची संकल्पना आहे. त्यासोबतच, धरणाचे ४१ दरवाजे आणि ८ वक्राकार दरवाजे अशा एकूण ४९ दरवाजातून एकाच वेळी पाण्याचा विसर्ग करता येईल. त्यामुळे धरणाच्या बॅक वॉटरमुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. म्हणून वक्राकार दरवाजे उभारले जात आहेत. पण त्यांचे काम कासवगतीने सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details