महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole Reaction : मुंबईची ओळख पुसण्याचा नवीन सरकारचा प्रयत्न : नाना पटोले

By

Published : Jul 23, 2022, 7:04 AM IST

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आज नवीन सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उभे करीत गंभीर आरोप केले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील देऊन या सरकारचा कुटील डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्यावरील व्हायरल व्हिडीओसंदर्भातदेखील त्यांनी चित्रा वाघ यांना ( BJP Leader Chitra Wagh ) कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्याशी सविस्तर बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली आहे.

Nana Patole Reaction
नाना पटोले

मुंबई : राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सर्वात प्रथम मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी सर्व परवान्यांना मंजुरी दिली. तसेच, या कामांना हिरवा कंदीलही दाखवला ( Mumbai Ahmedabad Bullet Train ) आहे. यामुळे मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख हळूहळू पुसली जाणार आहे. गुजरातचा नेहमीच महाराष्ट्रावर डोळा राहिला आहे. मुंबई गुजरातला सातत्याने हवी आहे. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यातीलच हा एक भाग आहे. मात्र, गुजरातमध्ये बसलेल्या नेत्यांच्या प्रति आपली निष्ठा दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केला आहे.

पूरपरिस्थितीबाबत जनतेचा आक्रोश :राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था कोलमडली असून, शासनाकडून मदत व्हावी यासाठी जनता आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीची मदत पोहोचत नाही कारण राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. दोन माणसांनी चालवलेल्या सरकारमुळे अडचणी निर्माण होत असून, पालकमंत्री नसल्यामुळे जनतेला मायबाप उरलेला नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली

नाना पटोले यांच्याशी संवाद


विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची निवड अवैध पद्धतीने :राज्यात मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्तीच असंवैधानिक पद्धतीने झाली आहे. याला आमचा सातत्याने विरोध आहे. न्यायालय यासंदर्भात आपला निर्णय देईलच. मात्र, अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या हुकूमशाहीला आमचा विरोध असून, राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगासाठी न्यायालयाला मोठे बेंच नेमावे लागले. हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी अजिबात भूषणावह नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.


शिंदेंचा दावा फोल :राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. उलट द्रौपदी मुर्मू यांना कमी मते मिळाल्याने त्यांच्या गटातीलच काही आमदार फुटले असण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे यानिमित्ताने गर्वाचे घर खाली झाले आहे, हे निश्चित असेही पटोले म्हणाले


वाघ यांच्या आरोपांबाबत कायदेशीर कारवाई :नाना पटोले यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओने खळबळ उडाली होती. त्यासंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नानांना ट्विट करून प्रश्न विचारला होता. तसेच, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहितीसुद्धा विचारली होती.भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपले चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कथित आरोपांची आपण गंभीर दखल घेतली असून, याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत आपण पावले उचलणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.


हेही वाचा :Atul Londhe On Chitra Wagh : चित्रा वाघ कडून ट्विट केलेले व्हिडीओ केवळ बदनामीच्या हेतूने - अतुल लोंढे

ABOUT THE AUTHOR

...view details