नवी दिल्ली -काँग्रेस नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे खास मित्र आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचे बुधवारी गोव्यात निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आपल्या वडिलांच्या मित्राच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी उपस्थित होते. राहुल गांधी अनवाणी चालत सतीश शर्मा यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
वडिलांच्या खास मित्राच्या पार्थिवाला राहुल गांधींनी दिला खांदा
माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचे बुधवारी गोव्यात निधन झाले. राहुल गांधी अनवाणी चालत सतीश शर्मा यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
![वडिलांच्या खास मित्राच्या पार्थिवाला राहुल गांधींनी दिला खांदा राहुल गांधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10691616-thumbnail-3x2-iokjhg.jpg)
सतीश शर्मा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरनं त्रस्त होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते निकटवर्तीय होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी 1191 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. जनादेश मिळवत त्यांनी विजय प्राप्त केला होता. ते नरसिंह राव सरकारमध्ये 1993 ते 1996 पर्यंत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री होते. 1996 मध्ये ते पुन्हा अमेठीत खासदार झाले होते. तर 1999 मध्ये रायबरेली मतदारसंघात अरूण नेहरू यांना पराभूत करून त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्यानंतर 2004 मध्ये राहुल गांधी यांना अमेठीमधून उभे करण्यासाठी त्यांना आपल्या जागेचा त्याग केला आणि सुलतानपूरमधून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर, सतीश शर्मा यांनी वैमानिकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि राजीव गांधींच्या कोअर कमिटीमध्ये प्रवेश केला. राजीव गांधींचे पंतप्रधान असताना सतीश शर्मा यांनी अमेठी-रायबरेली आणि सुलतानपूरचा पूर्ण कार्यभार सांभाळला.