वैज्ञानिक शिक्षण चार भिंतींपुरतं मर्यादित नसावं - माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू
विज्ञान शिक्षण मातृभाषेतून द्याला हवं, जेणेकरून विद्यार्थींना विज्ञान चांगलं समजेल, असं मत माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी मांडलंय.


Published : January 8, 2026 at 3:49 PM IST
हैदराबाद : देशाचे माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी विज्ञानाचं शिक्षण विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतून देण्यावर भर दिलाय. मातृभाषेतून शिकवल्यास विद्यार्थी विषय चांगल्या प्रकारे समजू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच वैज्ञानिक ज्ञान हे प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. ते हैदराबादेत आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
परिषदेच्या उद्घाटनात ईनाडूचं कौतुक
माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी ‘लॅब टू सोसायटी: रोल ऑफ सायन्स कम्युनिकेशन इन बिल्डिंग विकसित भारत @ 2047'या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं. ही परिषदा अकादमी फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन (एएसटीसी) आणि नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस, इंडिया (एनएएसआय) - तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमानं ‘ईनाडू’, ईटीव्ही आणि ईटीव्ही भारत यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आली होती.
ईनाडूनं दिली वैज्ञानिक दृष्टी
नायडू म्हणाले, “ईनाडू गटानं या परिषदेत सहभाग घेतल्याबद्दल मी खूप आनंदी आहे.” यावेळी त्यांनी रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक-अध्यक्ष रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. “तेलुगू वृत्तपत्र उद्योगात क्रांती घडवून आणणारे रामोजी राव चमकणारे तारे होते. ईनाडू समाजाच्या कल्याणासाठी विचार आणि कार्य करतं. वैज्ञानिक विषयांना ईनाडूत नेहमीच महत्त्वाचं स्थान दिलं जातं. तेलुगू वाचकांना वैज्ञानिक ज्ञान देण्याची रामोजी राव यांची उत्कट इच्छा होती. वैज्ञानिक ज्ञान चार भिंतींमध्ये बंदिस्त राहू नये, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजं,” असं ते म्हणाले.
विज्ञान सोपं आणि विश्वासार्ह असावं
वैज्ञानिक ज्ञान हे सामान्यांना सहज समजेल, अशा पद्धतीनं सादर केले पाहिजे, असा आग्रह नायडू यांनी धरला. “समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ईनाडूमधील ‘ज्ञान नेत्रम’ सदरात जटिल वैज्ञानिक विषय सामान्यांना समजतील अशा भाषेत प्रकाशित केले जातात. विज्ञानातील रुची जितकी वाढेल तितके देश विज्ञान क्षेत्रात पुढं जाईल. मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे,” असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलंय.
प्रयोगशाळेतील संशोधन समाजापर्यंत पोहोचावं
“प्रयोगशाळेतील संशोधनाचे परिणाम हे मोठ्या समाजाला लाभदायी ठरले पाहिजेत. शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत असणे गरजेचे आहे,” असं मत नायडू यांनी मांडलं.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुरुपयोगाची चिंता
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या युगात “खात्रीशीर माहिती” महत्त्वाची असल्याचं सांगताना ते म्हणाले, “एआय मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करू शकते. तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाला रोखण्यासाठी योग्य रचना निर्माण करावी लागेल.” शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या वापराबाबत पुरेशी माहिती न मिळाल्यानं मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. तसंच एम. एस. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांमुळं भारत आज अन्नधान्य निर्यात करू शकतो, याचं श्रेय वैज्ञानिक समुदायाला असल्याचं ते म्हणाले.
मातृभाषा डोळे, इंग्रजी चष्मा
विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असं नायडू यांनी सांगितलं. “मातृभाषा ही डोळ्यांसारखी आहे, तर इंग्रजी हा चष्मा आहे,” असं ते म्हणाले.
हे वाचलंत का :

