भारत स्मार्टफोन निर्यातीत अव्वल; 2025 मध्ये 30 अब्ज डॉलरची निर्यात – अश्विनी वैष्णव
भारतानं 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यातीत अव्वल स्थान (India tops smartphone exports ) पटकवलंय. भारतानं USD 30 अब्जची निर्यात केलीय.

Published : February 26, 2026 at 1:20 PM IST
नवी दिल्ली: भारतानं 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यातीत अव्वल स्थान (India tops smartphone exports ) पटकवलंय. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं की, 2025 मध्ये (जानेवारी-डिसेंबर) स्मार्टफोन निर्यात 30 अब्ज अमेरिकी डॉलरहून (सुमारे 2.5 लाख कोटी रुपये) अधिक झालाय. यामुळं स्मार्टफोन भारताची सर्वोच्च निर्यात श्रेणी बनली आहे. मंत्री म्हणाले, "जगासाठी स्मार्टफोन उत्पादन कारखाना बनत आहे भारत." ही उपलब्धी 'मेक इन इंडिया' अभियानाची यशस्वी अंमलबजावणी असल्याचं दिसून येतंय.
Becoming the smartphone manufacturing factory for the world. 🇮🇳 pic.twitter.com/Fd5jQPA38O
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 25, 2026
स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीतील वाढ
2024-25 मध्ये भारतात स्मार्टफोन उत्पादन 5.5 लाख कोटी (USD 60 अब्ज) इतकं होतं, तर निर्यात 2 लाख कोटी (USD 22 अब्ज) पर्यंत पोहोचली होती. 2025 मध्ये या आकडेवारीत लक्षणीय वाढ झालीय. Counterpoint रिसर्चचे सह-संस्थापक आणि संशोधन उपाध्यक्ष नील शाह यांनी सांगितलं की, भारतात 2025 मध्ये सुमारे 30 कोटी मोबाइल फोन उत्पादित झाले असून, त्यापैकी सुमारे 7.5 कोटी स्मार्टफोन निर्यात झाले आहेत. उच्च सरासरी विक्री किंमत (ASP) असलेले प्रीमियम स्मार्टफोन, विशेषतः अमेरिका बाजारपेठेत, निर्यात झाले आहेत.
Apple चा उत्पादन विस्तार
Apple कंपनी भारतातील निर्यात वाढीची मुख्य शक्ती ठरली आहे. अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि चीनवर लावलेल्या टॅरिफमुळं Apple नं भारतात उत्पादन विस्तार केला. यामुळं भारतातून iPhone निर्यात रेकॉर्ड स्तरावर पोहोचलाय. IDC च्या 2025 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अहवालानुसार, Apple नं घरगुती बाजारात एका तिमाहीत 50 लाख iPhone पुरवठा केला. Apple प्रीमियम (53,000-71,000) आणि सुपर-प्रीमियम (70,000 पेक्षा जास्त) सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. भारतातील स्मार्टफोन बाजाराच्या वाढीला अॅपलमुळं चालना मिळालीय.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यात
2025 मध्ये भारताच्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 4 लाख कोटी (सुमारे USD 44 अब्ज) रुपय झाली होती. मंत्री वैष्णव यांनी सांगितलं की, 2026 मध्ये चार नवीन सेमीकंडक्टर प्लांट्स उत्पादन सुरू करताच ही वाढ आणखी वेगवान होईल. गेल्या 11 वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 6 पट आणि निर्यात 8 पट वाढली आहे. हे क्षेत्र रोजगार निर्मिती आणि परकीय चलन कमावणारे ठरलं आहे.
भारतानं स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीत मिळवलेलं यश 'आत्मनिर्भर भारत' आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताची भूमिका मजबूत करतंय. Apple आणि Samsung सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीनं भारत जगातील स्मार्टफोन उत्पादन केंद्र बनत आहे. भविष्यात सेमीकंडक्टर उत्पादन सुरू झाल्यास निर्यात आणखी वाढेल, ज्यामुळं अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.
हे वाचलंत का :

