मराठी भाषा, संस्कृती, इतिहासाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष; साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा राज्यकर्ते, साहित्यिक आणि लेखकांना घरचा आहेर
साताऱ्यात संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव आणि दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं.

Published : December 31, 2025 at 8:51 PM IST
सातारा : महाराष्ट्रात भाषा, संस्कृती, साहित्य अन् ऐतिहासिक विचारांचा ऱ्हास होत असून आजच्या राज्यकर्त्यांचे त्याकडं दुर्लक्ष झाल्याची टीका 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी केली आहे. साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी थेट संमेलनाध्यक्षांनीच लेखक आणि राज्यकर्त्यांवर टीका केल्यानं प्रत्यक्ष साहित्य संमेलनात त्याचे पडसाद उमटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीला घरघर : साताऱ्यातील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरूवारपासून (१ जानेवारी) प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांनी कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "यशवंराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीला घरघर लागावी, ही खूप वाईट गोष्ट आहे. राज्यकर्ते, साहित्यिक आणि लेखकांचे मराठी भाषा, संस्कृती, इतिहासाकडं दुर्लक्ष होणं, हे खेदजनक आहे."
ऐतिहासिक विचारांचा ऱ्हास होत आहे : 'पानिपत'कार विश्वास पाटील पुढे म्हणाले की, "मराठीतील एक उत्तम प्रशासक, राजकारणी, लेखक म्हणून आपण यशवंराव चव्हाण यांच्याकडं पाहतो. अलीकडं महाराष्ट्रभर मराठी भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा आणि ऐतिहासिक विचारांचा ऱ्हास होताना दिसून येतोय. ही पडझड वेळेत आपण थांबवली नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील."
मोठी ग्रंथालये बंद पडू लागली आहेत : हरियाणातातील पंचकुलामध्ये घर तिथे ग्रंथालय, अशी चळवळ सुरु असून महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालयांना घरघर लागल्याचं पाहून वाईट वाटतं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. मोठी ग्रंथालये बंद पडू लागली आहेत. जी आहेत त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही. रोजगार हमीवरच्या मजुरापेक्षाही कमी पगार ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मिळत आहे, त्याकडं देखील त्यांनी लक्ष वेधलं.
...त्यांनी माय मराठीवर मनापासून प्रेम केलं : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण हे तिघेही ग्रंथवेडे होते. प्रत्येकाकडं हजारो पुस्तके होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांची मराठी भाषा पहिली तर त्यांच्या मराठी भाषेचा आकार, ऊकार, गंध आणि सुगंध हा वेगळा आहे. कारण, त्यांनी माय मराठीवर मनापासून प्रेम केलं, असे गौरवोद्गारही विश्वास पाटील यांनी काढले.
हेही वाचा -
- साताऱ्यातील साहित्य संमेलन 'घालमोड्या दादां'चे, अलुतेदार-बलुतेदारांनी त्यांच्या मंडपात जाऊ नये - डॉ. भारत पाटणकर
- शिरूर कासारमध्ये सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात; साहित्य दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू
- 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; मृदुला गर्ग यांच्याहस्ते साहित्य संमेलनाचे होणार उद्घाटन

