इन्शुरन्स कंपनीच्या सेमिनारसाठी गेलेले साताऱ्यातील 34 जण अडकले दुबईत, मायदेशी परतण्यासाठी आतूर
सातारा जिल्ह्यातील 34 जण दुबईत अडकले आहेत. सर्वजण सुखरूप असून एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे.


Published : March 3, 2026 at 8:46 PM IST
|Updated : March 3, 2026 at 8:57 PM IST
सातारा : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळं दुबईसह आखाती देशांतील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. याचा फटका जगभरातील नागरिकांसह भारतीय नागरिकांना बसला आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सेमिनारसाठी गेलेले कर्मचारी आणि एजंट मिळून सातारा जिल्ह्यातील 34 जण दुबईत अडकून पडले आहेत. सर्वजण सध्या हॉटेलमध्ये सुरक्षित असले तरी मायदेशी परतण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारकडून गरजूंना मदत : युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं मंगळवारी (3 मार्च) एक व्हॉटसॲप क्रमांक (+971503654357) जारी केला आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारकडून गरजूंना मदत केली जाणार आहे. केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. दोन-तीन दिवसात मायदेशी परतू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सातारा जिल्ह्यातील 34 जण अडकले दुबईत : नवी दिल्लीतील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत. कर्मचारी आणि एजंट्ससाठी कंपनीनं दुबईत एका सेमिनारचे आयोजन केलं होतं. त्या सेमिनारसाठी सातारा जिल्ह्यातील 34 जणांची निवड झाली होती. 27 फेब्रुवारीला सर्वजण दुबईला रवाना झाले होते. मात्र, त्यानंतर आखाती देशात युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर हल्ले सुरू केले आहेत. यात दुबईला देखील लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळं पर्यटकांसह व्यावसायिक कारणांसाठी गेलेले हजारो लोक दुबईत अडकले आहेत.
हॉटेलबाहेर पडू नये, अशा सूचना : दुबईतील प्रशासनानं परदेशी लोकांची संपूर्ण सोय मोफत केली आहे. परंतु, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक भयभीत आहेत. साताऱ्यातील लोक एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. हॉटेलबाहेर पडू नये, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप तरी आम्हाला कसलाही धोका जाणवला नसल्याची माहिती केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या कराड शाखाधिकारी साधना पाटील यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. तसंच विमानाची व्यवस्था होण्याची सर्वजण वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :

