अमेरिका-इराण युद्धाचा फळ व्यापारावर परिणाम; इराणी सफरचंद महागले
इराणवरून भारतात येणारी सफरचंद देखील बंद झाल्यामुळं त्यांच्या किमतीत प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे.


Published : March 4, 2026 at 5:05 PM IST
|Updated : March 4, 2026 at 7:30 PM IST
पुणे : इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अशात सध्या जगभरात पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात या आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय फळांना मागणी असते, तर दुसरीकडे इराणमधील सफरचंदला देखील भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. मात्र, इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारतीय फळांवर मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तसंच इराणवरून भारतात येणारी सफरचंद देखील बंद झाल्यामुळं त्यांच्या किमतीत प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. तर भारतीय फळं जी आखाती देशांमध्ये जात असतात, ती पोर्टवरच पडून असल्यामुळं या फळांच्या किंमती कमी झाल्या आहेत.

युद्धाचा फळ व्यापारावर परिणाम : दरम्यान, याबाबत या आखाती देशांमध्ये फळांची निर्यात करणारे सुयोग झेंडे म्हणाले की, "सध्या चालू असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळं नुकसान हे भारतीय शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात होत आहे. रमजान महिन्यात गल्फमध्ये फळांना खूप मोठी मागणी असते. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात केळी, द्राक्षे, कांदा आणि तांदूळ यांची निर्यात होतो. आज मितीला मुंबई बंदरात 250/300 रेफर कंटेनर केळी, 100 च्या आसपास द्राक्षांचे रेफर कंटेनर आणि इतर मालाचे नॉर्मल 350/400 रेफर कंटेनर आहेत. जे आखाती देशांमध्ये जावू शकले नाहीत. तसंच त्या देशांमधील पोर्ट बंद असल्यामुळं इकडून गेलेला काही माल तिकडं अद्याप पोहोचला नाही. यामध्ये 500/600 कंटेनर केळी, द्राक्षे आहेत आणि इतर 500/550 कंटेनर आहेत. याशिवाय, भारतात आयात होणारे सफरचंद, किवी आणि खजूर असे इराण पोर्टवर 800/900 कंटेनर आहेत."
शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान : "सफरचंद, किवी जवळपास 23 ते 24 टन असतात. ज्यांची किंमत 30 ते 32 लाख रुपये असते. तर खजूर 45 लाखांच्या आसपास असते. दरम्यान, आखाती देशांमध्ये जाणारी केळी, द्राक्षे, कांदा हे बहुतेक महाराष्ट्रतील जास्त आहे. त्यामुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. तसंच भारतीय बाजारात सुद्धा या शेत मालाचे बाजारभाव खूप कोसळले आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात इराणमधील अब्बास इथं असलेल्या पोर्टवर हल्ला झाल्यामुळं तिथं लाईट नाही. त्यामुळं तिथं जे रेफर कंटेनर आहेत. त्यातील शेतमाल खराब होत आहे. तेथील माल परत आणताही येत नाही, कारण शिपिंग वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं याबाबत काही ठोस निर्णय घ्यावा व नुकसान भरपाई मिळावी," अशी आमची मागणी असल्याचं सुयोग झेंडे यांनी सांगितलं.

युद्धामुळं दुबईला जाणारा कांदा बंदरात अडकला
छत्रपती संभाजीनगर : इराण-इस्रायल युद्धामुळं लासूर येथून पाठवण्यात आलेला 900 क्विंटल कांदा बंदरात अडकल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून लासूर येथील बाजारसमिती प्रसिद्ध आहे. तेथून दुबईसाठी मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार दोन वेळा कांद्यानं भरलेले कंटेनर पाठवण्यात आले होते, तिसरे कंटेनर 28 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आले. मुंबई येथून समुद्र मार्गानं दुबईकडे सगळा माल जाणार होता, मात्र इराणनं दुबईवर हल्ला केल्यानं पाठवण्यात आलेला कांदा मध्येच थांबला. इतकंच नाही तर पुढच्या फेरीचे काम थांबवण्यात आल्याची माहिती व्यापारी शुभम पवार यांनी दिली.

लासूर येथून पाठवण्यात आला होता कांदा : कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासूर बाजार समितीतील कांदा व्यापारी शुभम पवार त्यांना दुबई येथून मोठ्या प्रमाणात कांदे आयात करण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार त्यांनी मागणीनुसार पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. पहिली टप्पा 12 फेब्रुवारी रोजी, दुसरा टप्पा 20 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला तो दुबईला पोहचला देखील होता. तिसरा टप्पा 28 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला, त्यावेळी बाजारसमितीमध्ये 2400 गोण्यांमध्ये तब्बल 900 क्विंटल कांदा कंटेनर मधून पाठवण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी त्या गाडीचे पूजन करून भेटलेल्या संधी बाबत आनंद व्यक्त केला. मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईहून पुढं समुद्र मार्गानं हा कांदा पुढे जाऊ शकला नाही. इराक आणि इस्रायल युद्धामुळं सर्व वाहतूक बंद ठेवल्यानं सर्व कांदा प्रवासातच थांबला असल्यानं व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती : लासूर येथील कांदा व्यापारी शुभम पवार यांना दुबई इथं कांदा पाठवण्याचं काम मिळालं होते. त्यात जवळपास दहा ते पंधरा टप्पे देण्यात आले असून त्यामध्ये दहा ते बारा हजार क्विंटल कांदा पाठवण्यासाठी मागणी करण्यात आली होती. तीन टप्प्यातील कांदा पाठवण्यात आला, त्यातील शेवटी पाठवलेला कंटेनर रस्त्यात अडकला आहे. मात्र पुढील असलेले टप्पे पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. युद्धामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तसंच इराण आणि इस्रायल युद्ध लवकर थांबणे गरजेचं आहे. राज्यातील अनेक व्यावसायिकांचे व्यवहार विदेशातील कंपन्यांशी असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी भीती कांदा व्यापारी शुभम पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :

