अवकाळी पाऊस, गारपिटीने परळी, अंबाजोगाई, केज, बीड, पाटोदा तालुक्यांत पिकांचं नुकसान
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.


Published : February 24, 2026 at 11:21 AM IST
बीड- कालपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलानंतर परळी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, माजलगाव तालुक्यांत बऱ्याच गावांमध्ये अवकाळी पाऊस, वादळासह गारपीट झाल्याने उभ्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.
अवकाळी पाऊस आणि बऱ्याच गावांमध्ये गारपीट : रविवारी रात्रीपासून परळी अंबाजोगाई, केज, पाटोदा, माजलगाव तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि बऱ्याच गावांमध्ये गारपीट झाली असून, त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका, भाजीपाला, फळपिके यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी तत्काळ पंचनामे करून नुकसानीचे अहवाल शासनास पाठवण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्यात.
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे प्रचंड मोठे नुकसान : यापूर्वी देखील खरीप हंगामात विशेष करून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यांनी पुढाकार घेतलाय.
हेही वाचाः

