मुंबईतील आणखी दोन मेट्रो प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी आखून दिली डेडलाईन
मुंबईतील एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देत फडणवीसांनी ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पाला अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केलीय.


Published : November 4, 2025 at 9:49 AM IST
मुंबई : मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. उपनगरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या दोन मेट्रो लाईन्सचं काम पुढच्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांसाठी डेडलाईन आखून दिली असून, उशीर झालेल्या कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत.
'या' प्रकल्पांचा समावेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते. मुंबई मेट्रो लाईन 2B ही डी. एन. नगर ते डायमंड गार्डन-मंडालेपर्यंत धावणार असून, यात एकूण 19 स्टेशन्स असतील. हा प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत तयार करावी, असे निर्देश दिलेत, यासाठी श्याम नगर स्टेशनजवळील जमिनीच्या अडचणी 15 दिवसांत सोडवण्याचे आदेश नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत. शिवडी ते वरळी जोडमार्गाचं कामही दिवसरात्र चालवून लवकरात लवकर पूर्ण करावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उशीर झालेले सर्व प्रकल्प वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे अधिकारी आणि कंत्राटदारांनी खास लक्ष द्यावं, अशी सूचनाही त्यांनी केली.
बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ : बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्यात. मुंबईतील एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करून फडणवीस यांनी ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पाला अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
कोणता प्रकल्प कधी पूर्ण होणार? : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चे कामकाज 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होईल, असे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटांवर येणार आहे, यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ रक्कम द्यावी, असेही निर्देश दिलेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा 23.8 किमी रस्ता बांधकाम सुरू आहे. यातील 19 किमीचा रस्ता तयार झाला असून, संपूर्ण रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करणार : त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथे दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील नागरिक नवी मुंबई विमानतळाकडे सहज पोहोचू शकणार आहेत. वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून, हा प्रकल्प 30 डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे टप्पे करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेत.
हेही वाचाः

