'यंदा कर्तव्य आहे'; तुळशी विवाहनंतर उडणार लग्नांचा बार, यंदा 55 विवाह मुहूर्त
दिवाळीनंतर सगळ्यांना लग्न सराईचे वेध लागते. यंदा तुळशी विवाहनंतर (Tulsi Vivah) 22 नोव्हेंबरपासून हिंदू तिथी नुसार लग्नसराईचा धुमधडाका सुरू होणार आहे.

Published : October 30, 2025 at 8:40 PM IST
नाशिक : तुळशी विवाहानंतर (Tulsi Vivah) लगीन घाईला सुरुवात होते. यंदा 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह असून त्यानंतर 22 नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांना प्रारंभ होणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंतच्या हंगामात 55 विवाह मुहूर्त आहेत. गतवर्षी यंदा 15 विवाह मुहूर्त कमी आहेत.
22 नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांना प्रारंभ : हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशीच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगत होते. त्यानंतर विवाहाचे मुहूर्त काढण्याची परंपरा आहे. यंदा 2 नोव्हेंबरला तुळशी विवाह असून त्यानंतर 22 नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांना प्रारंभ होत आहे. गतवर्षी तुळशी विवाहनंतर जुलैपर्यंतच्या कालावधीत 70 मुहूर्त होते. मात्र, यंदा अवघे 55 मुहूर्त आहेत. त्यातही जानेवारी महिन्यात तर एकही मुहूर्त नाही. त्यामुळं हिंदू पंचांगानुसार हाती लागणाऱ्या 55 मुहूर्तांमध्येच इच्छुकांना विवाह मुहूर्त साधून घ्यावा लागेल.
तुळशी विवाह 2 नोव्हेंबरला : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला अर्थात 2 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 3 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यामुळं तिथीनुसार तुळशी विवाह सोहळा रविवारी 2 नोव्हेंबरला करता येणार आहे, अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली.
तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त
- नोव्हेंबर 2025 - 22,23,25,26,27,30
- डिसेंबर 2025 - 2,5
- फेब्रुवारी 2026 - 3,5,6,7,8,10,11,12,20,22,25,26
- मार्च 2026 - 5,7,8,12,14,15,16
- एप्रिल 2026 - 21,26,28,29,30
- मे 2026 - 1,3,6,7,8,9,10,13,14
- जून 2026 - 19,20,22,23,24,27
- जुलै 2026 - 1,2,3,4,7,8,9,11
तुळशी विवाह महत्व : हिंदू धर्मानुसार तुळशी विवाहपासून लग्नसराईला शुभ काळ मनाला जातो. तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या शालिग्राम रूपातील विवाहाचा उत्सव प्रेम,भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुळशी विवाहच्या दिवशी तुळशीची कुंडी स्वच्छ करून त्यावर रंगीबेरंगी रांगोळी काढावी. मग तुळशीला नवीन वस्त्र, हार, फुल आणि दागिने घालून नववधू सारखे सजवावे. तुळशी विवाहाच्या वेळी तुळशीच्या बाजूला दोन ऊस ठेवावेत कारण ते शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.
हेही वाचा -

