ETV Bharat / state

साताऱ्यातील साहित्य संमेलन 'घालमोड्या दादां'चे, अलुतेदार-बलुतेदारांनी त्यांच्या मंडपात जाऊ नये - डॉ. भारत पाटणकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने बहिष्कार टाकल्याने संमेलन चांगलंच गाजण्याची चिन्हं आहेत.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठावरील मान्यवर
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठावरील मान्यवर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 27, 2025 at 10:04 PM IST

|

Updated : December 27, 2025 at 10:42 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - साताऱ्यात १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बहिष्कार टाकला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य डॉ. भारत पाटणकर यांनी यासंदर्भात मांडलेला ठराव एकमताने मंजूर झाला असून छ. संभाजीराजेंबद्दल बदनामीकारक लिखाण करणारा गद्दार माणूस अध्यक्ष असणाऱ्या 'घालमोड्या दादां'च्या संमेलनाच्या मंडपात अलुतेदार-बलुतेदारांनी जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


साताऱ्यातील संमेलन हे 'घालमोड्या दादांचं संमेलन' असल्याची टीकाही 'विद्रोही'ने केली आहे. तसंच छत्रपती संभाजीराजेंबद्दल बदनामीकारक लिखाण करणारा गद्दार माणूस संमेलनाचा अध्यक्ष आहे. त्या संमेलनाच्या मंडपात अलुतेदार-बलुतेदारांनी जाऊ नये. अन्यथा आपली गद्दारी सिद्ध होईल, असं आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी केलं. यावेळी 'उपरा'कार पद्मश्री लक्ष्मण माने, कॉ. धनाजी गुरव, डॉ. सुहास महाराज फडतरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील, ॲड. वर्षा देशपांडे, कॉ. विजय मांडके उपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर (ETV Bharat Reporter)

साताऱ्यात होणाऱ्या 'घालमोडे दादां'च्या साहित्य संमेलनावर महाराष्ट्रातील जनतेनं बहिष्कार टाकावा, असं आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी केलं आहे. पाटणकर पुढे म्हणाले की, मराठी ग्रंथकार सभेनं (ज्याला आजचे साहित्य संमेलन म्हणतात) १८८५ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यामार्फत महात्मा फुलेंना निमंत्रण पाठवलं होतं. परंतु, 'उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाला मी येणार नाही' असं सांगून महात्मा फुलेंनी ते निमंत्रण धुडकावून लावलं होतं. कारण त्यांना त्यावेळच्या साहित्य संमेलनांमधील जातीय विषमतेवर आणि ब्राह्मणी वर्चस्वावर आक्षेप होता. या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती पाहिली तर त्या काळापेक्षाही वाईट असल्याची टीका डॉ. पाटणकरांनी केली.



बुद्ध, अश्वघोष, धर्मकीर्ती या बौद्ध दार्शनिक मार्गदर्शकांपासून पुढे कबीर, रविदास, नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, सोयराबाई, चोखा मेळा, मुक्ताबाई अशी संतपरंपरा या देशाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते भारतवर्षाचे शेवटचे सम्राट शंभू पुत्र शाहू महाराज ते थोरले प्रतापसिंह महाराज, अशीही परंपरा आहे. या उलट घालमोड्या दादांची आजची परंपरा या इतिहासाला अंधारात घालणारी आहे. मनुस्मृतीसारखी, बहुजन जाती-जमाती आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारित व्यवस्था पुन्हा या देशात राबवणारी आणि इतिहासाला विकृत करून खरा इतिहास गायब करणारी आहे. त्यामुळेच घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला पाहिजे, असं डॉ. भारत पाटणकर म्हणाले.

Last Updated : December 27, 2025 at 10:42 PM IST