सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या 14 गावांची तहान भागणार; बागलिंगा लघु जलप्रकल्प वर्षभरात सुरू होणार!
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारा बागलिंगा लघु जलप्रकल्प हा मुख्य अभयारण्यापासून 8.5 किलोमीटर अंतरावर आहे.


Published : December 24, 2025 at 2:03 PM IST
|Updated : December 24, 2025 at 8:59 PM IST
अमरावती : मेळघाटात मुसळधार पाऊस बरसत असला तरी पाणी साठवणुकीच्या ठोस योजनांच्या अभावामुळं आदिवासी गावांना वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अशा परिस्थित आता चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या बागलिंगा गावात बांधण्यात येणाऱ्या लघु जल प्रकल्पाद्वारे बागलिंगासह 14 गावांतील पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

असा आहे हा प्रकल्प : "मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारा बागलिंगा लघु जलप्रकल्प हा मुख्य अभयारण्यापासून 8.5 किलोमीटर अंतरावर आहे. मोठ्या धरणांच्या तुलनेत हा प्रकल्प लहान असून यामध्ये पाणी साठवून एकूण 14 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवलं जाणार आहे. या प्रकल्पामुळं लगतच्या गावातील शेतीला देखील फायदा होणार," असं बागलिंगा गावाच्या सरपंच निर्मला धांडेकर यांनी सांगितलं. यासंदर्भात निर्मला धांडेकर यांनी "ईटीव्ही भारत"शी संवाद साधला. यावेळी पुढं त्या म्हणाल्या की,"सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणारी शेत जमीन सरकारनं या प्रकल्पासाठी संपादित केली असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला आहे."
तलावात साचलंय पाणी : "या प्रकल्पासाठी 2009 पासून सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळानं देखील परवानगी दिली आहे. या ठिकाणी खोदकाम करून भव्य तलाव निर्माण केला. आता पावसाळ्यात तलावात पाणी साचलं आहे. या प्रकल्पाच्या खालच्या बाजूला पाणी शुद्धीकरण केंद्रामार्फत प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवलं जाणार आहे. बागलिंगा ग्रामपंचायत अंतर्गत लगतच्या 14 गावांना पाणी पुरवठा केला जाईल," असं निर्मला धांडेकर यांनी सांगितलं.

पाण्याची भीषण टंचाई संपणार : "आमच्या गावासह लगतच्या 14 गावांमध्ये वर्षभर पाण्याची टंचाई भासायची. फार दूरवरून पाणी आणावं लागायचं. आता लघु जलप्रकलपामुळं पाण्याची टंचाई संपणार, " अशी आशा निर्मला धांडेकर यांनी व्यक्त केली.

वर्षभरात पूर्ण होणार प्रकल्प : "2009 पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात आहे. बागलिंगा गावात जलशुध्दीकरण केंद्राचं काम झपाट्यानं सुरू आहे. गावात पाणी साठवणुकीसाठी मोठी टाकी बांधली जात आहे. आता वर्षभरात या प्रकल्पाची सर्व कामं पूर्ण होतील," असं निर्मला धांडेकर यांनी सांगितलं.

'या' 14 गावांना होणार लाभ
- बागलिंगा
- चिचखेडा
- कुलंगणा
- मोझरी
- वस्तापूर
- सोमवारखेडा
- मलकापूर
- रामटेक
- डोमन बल्ला
- हरदामल
- चिवाती
- बदनापूर
- कालापाणी
हेही वाचा :

