नागपूरच्या चाणक्यपुरम भागात गडरलाईनच्या आगीत शेकडो पाईप जळून खाक
नागपूरध्ये रविवारी राऊळगाव येथील बारूद कंपनीत मोठी दुर्घटना घडली. यात 18 कामगारांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ नरसाळा भागात गडरलाईनचे शेकडो प्लास्टिक पाईप भस्मसात झाले.

Published : March 1, 2026 at 4:07 PM IST
नागपूर : रविवारचा दिवस नागपूरकरांसाठी दुःखाचा ठरलाय. त्याचं कारण म्हणजे राऊळगाव येथील बारूद कंपनीत पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामध्ये 18 कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना नरसाळा भागात गडरलाईनचे शेकडो प्लास्टिक सिंथेटिक पाईप तिथं लागलेल्या आगीत भस्मसात झालेत. सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
आगीत शेकडो प्लास्टिकचे सिंथेटिक पाईप भस्मसात : नरसाळाच्या चाणक्यपुरम भागात सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेले गडरलाईनसाठी उपयोगात येणारे शेकडो प्लास्टिकचे सिंथेटिक पाईप आगीत भस्मसात झालेत. नरसाळा आणि चाणक्यपुरम परिसरात गडरलाईन काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी लागणारे हजारो पाईप पाण्याच्या टाकीजवळ ठेवले होते.
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळं टळली मोठी हानी : रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाईपाच्या साठ्याला आग लागल्याचं नागरिकांच्या लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. चाणक्यपुरम येथील रहिवासी जितेंद्र मुळे यांनी अग्निशमन विभागाला या घटनेबाबत फोन करून माहिती दिली. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये अग्निशमन विभागाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्ननंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
कचऱ्याला लागलेली लाग भडकली : या आगीत शेकडो पाईप जळून खाक झालेत. स्थानिक नागरिक जितेंद्र मुळे यांनी पुढाकार घेत आग मोठ्या प्रमाणात पसरणार नाही, याची खबरदारी घेतली. यानंतर अग्निशमन विभाग आणि पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यामुळं आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवणं शक्य झालं. ज्या ठिकाणी आग लागली तिथं आजूबाजूला घरं आहेत. मोकळ्या जागेत कचरा जाळल्यामुळं ही आग पाईपापर्यंत पोहोचली, असा नागरिकांचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा :

