'शिवसेना (उबाठा)-मनसे मुंबई महापालिकेत 100 हून अधिक जागांवर विजय मिळवणार'- संजय राऊत
शिवसेनेचे (उबाठा) ज्येष्ठ नेते आणि खासदार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधुंची युती विजयी होणार, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Published : December 31, 2025 at 1:40 PM IST
|Updated : December 31, 2025 at 1:49 PM IST
मुंबई : उद्धव ठाकरे (शिवसेना (उबाठा)) आणि राज ठाकरे (मनसे) एकत्र आल्यामुळं मुंबईतील तब्बल 67 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आगामी मुंबई निवडणुकीत किती जागांवर विजय मिळवणार त्याचा आकडाच जाहीर केला.
117 ते 120 जागांवर आम्ही विजय मिळवू : "तुम्ही 67 काय घेऊन बसलात, आम्ही याक्षणी 115 जागा जिंकत आहोत. महापालिकेत बहुमतासाठी जो आकडा लागतो, तो आम्ही केव्हाच पार केला आहे. याक्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उबाठा) हे शतक पार करत आहेत. 117 ते 120 जागांपर्यंत आम्ही विजय मिळवू, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. आमच्या मतदारांनाही आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंचाच विजय होणार," असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांचा युतीवर हल्लाबोल : या युतीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर लांगूलचालनाचा आरोप केला होता. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला. "भाजपामध्येच सध्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि इनकमिंग उमेदवार यांच्यावरून वाद सुरू आहेत. त्याचा उद्रेक राज्यभर दिसतोय."
- 14 महानगरपालिकांमध्ये महायुती तुटली आहे. बंडखोरांची पक्षावर की तिकिटावर निष्ठा आहे, असे बाळासाहेब विचारायचे. निष्ठा पैशाच्या पुरात वाहून गेलीय. शिंदे गट, भाजपा, अजित पवार गट अर्जासोबत उमेदवारांना पॅकेज देतात. मोदी ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी जातील, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
मुंबईकरांचं लक्ष निवडणुकीकडं लक्ष : एकीकडंठाकरे बंधूंची युती, दुसरीकडं शतक पार करण्याचा दावा आणि तिसरीकडं आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण या सगळ्यांमुळं आगामी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत रंगतदार आणि निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सामान्य मुंबईकरांच्या नजरा आता या लढतीकडं लागल्या असून ठाकरे बंधूंचा एकत्रित करिश्मा प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो, हे निवडणूक निकालच ठरवतील.
हेही वाचा :

