ETV Bharat / state

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य

दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

Rich Dagdusheth Halwai offers 2,000 kg of grapes to Lord Ganesha
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 5:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे: काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आलाय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

Rich Dagdusheth Halwai offers 2,000 kg of grapes to Lord Ganesha
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य (Source- ETV Bharat)

सह्याद्री फार्मला 22000 शेतकरी जोडले गेले : द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जातेय. आज सह्याद्री फार्मला 22000 शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंट वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम आता श्रद्धा, कृषी आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम ठरला आहे.

Rich Dagdusheth Halwai offers 2,000 kg of grapes to Lord Ganesha
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य (Source- ETV Bharat)

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला विघ्नहर्त्याचे आशीर्वाद : यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले की, द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत जावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या भावनेतून हा नैवेद्य अर्पण केला जातोय. या उपक्रमाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्याचा सामाजिक पैलू. गणरायाच्या आराशीनंतर लगेचच ही ताजी द्राक्षे प्रसाद म्हणून भाविकांना वाटली जातात. तसेच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि सेवाभावी संस्थांनाही हा प्रसाद दिला जातो. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता समाजाशी जोडलेला लोकाभिमुख उपक्रम ठरतो.

द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्व : यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरूपी वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचाः

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम; सोनं-चांदी विक्रमी दराच्या दिशेने

शाहू मिल पुनरुज्जीवित करण्याचा कोल्हापूरकरांचा निर्धार; खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक