'विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या विधानासाठी माफी मागतो'; टीका होताच रवींद्र चव्हाण यांचं घूमजाव
विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Published : January 6, 2026 at 3:51 PM IST
|Updated : January 6, 2026 at 4:46 PM IST
छत्रपती संभाजीनगर - दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या विधानावरुन चव्हाण यांनी घुमजाव करत देशमुख कुटुंबीयांची दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसनं देखील भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय.
रवींद्र चव्हाण यांचं घुमजाव - "मी दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर जराही टीका-टिप्पणी केली नाही. विलासराव देशमुख मोठे नेते होते. त्यामुळं त्यांना फोकस करून काँग्रेस तिथं मत मागत आहे. त्या संदर्भात मी विधान केलं होतं. तरी त्यांचे चिरंजीव व कुटुंब यांचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली. तसंच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, वक्तृत्व कर्तृत्व, नेतृत्वाचा संगम आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेले स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी केवळ लातूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पुसल्या जाऊ जाऊ शकत नाही. विलासराव… pic.twitter.com/NRsUJEHtPW
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 6, 2026
दिलगिरी व्यक्त केली - "निवडणुका या कशासाठी असतात तर त्या नागरी सुविधा कोणता पक्ष गतिमान देईल यासाठी असतात. सर्व नागरी सुविधा लातुरात व्हायला हव्यात," असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी अधिक बोलणं टाळलं. तर त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली.
विलासराव समजून घ्यायचे असतील तर रविंद्र चव्हाणांनी एकदा गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा इतिहास समजून घ्यावा.मराठवाडयाला लाभलेल्या या दोन उत्तुंग नेत्यांनी परस्पर विरोधी राजकारण करत असतांना देखील मैत्रीचे आणि स्नेहाचे बंध जोपासले होते.आपुलकी आणि सौहार्द जपला होता.त्यांच्या राजकारणात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 6, 2026
देशमुख कुटुंबीयांनी केली टीका - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर देशमुख कुटुंबीयांनी कडाडून टीका केली. दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "लोकांसाठी जगणाऱ्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही." अशा भाषेत त्यांनी टीका केली. तर आमदार अमित देशमुख यांनी देखील टीका करत "राजकारण कुठल्या थराला चाललंय हा प्रश्न पडलाय. दुर्दैवी आहे की, त्यांनी असं विधान करायला नको होतं. लातूर किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. सर्व स्तरातून निषेध होतोय," असं म्हटलंय.
सपकाळ यांनी देखील केली टीका - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर लगेच टीका करून उत्तर दिलं. "दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण झाला नाही. अनेकजण इच्छा बाळगून आलेत. मात्र, स्वाभिमानी लातूरकरांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. सत्तेचा माज असलेले भाजपा नेते लातूर येथे येऊन बरळून जातात की, साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्या. विलासराव देशमुख यांचं लातूरशी असलेलं नातं भाजपाला कधीच कळणार नाही. लातूरच्या कर्तृत्व संपन्न सुपुत्राचा अवमान लातूरकर कधीच सहन करणार नाही, भाजपावाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा," अशी टीका सपकाळ यांनी भाजपावर केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या बाबत काल लातूरमध्ये जे काही वक्तव्य केले गेले त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 6, 2026
कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा…
विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसणं शक्य नाही : नाना पटोले - या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही निषेध व्यक्त केला. "विलासराव देशमुख यांच्या आठवणी केवळ लातूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पुसल्या जाऊ शकत नाहीत. विलासराव देशमुख यांच्यासारखं दिलखुलास व्यक्तिमत्व राज्याच्या राजकारणात होतं, ही महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी आणि त्यांची मानसिकता दाखवणारं आहे. रवींद्र चव्हाणच काय कुणालाही विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसणं शक्य नाही. आपल्या संस्कृतीत दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपल्या जातात. मात्र संस्कृतीच माहिती नसणाऱ्या लोकांची विकृत मानसिकता हे समजू शकत नाही. विलासराव देशमुख यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण जे बोलले ते हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही आणि येणाऱ्या काळात त्यांना मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा -

