नाशिक जिल्ह्यात 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; 32 हजार नवीन रोजगार तयार होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुंभ उद्योग संगम आणि 'नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते.

Published : May 6, 2026 at 8:30 PM IST
नाशिक : येथे आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वाचं विधान केलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, नाशिक जिल्ह्यात सुमारे 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून यामुळे सुमारे 32 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्याला ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा रोडमॅप तयार असून विकासाचा भौगोलिक समतोल साधण्यावर भर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यानं गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून दरडोई उत्पन्न 2014 मधील 1.13 लाख रुपयांवरून सुमारे 2.65 लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले? : जिल्ह्यात 300 पेक्षा अधिक सामंजस्य करार झाले असून अनेक मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक सुरू आहे. महिंद्रा कंपनीसह इतर उद्योगांनीही गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे 57 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात आली असून दाव्होस येथूनही 12 हजार कोटींची गुंतवणूक मिळाली आहे. नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नवीन औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
कुंभ आणि उद्योगाचा संगम साधत नाशिकचा विकास करण्यावरही त्यांनी भर दिला. धार्मिक पर्यटनासोबत आर्थिक दृष्टिकोनातूनही नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कुंभमेळा हा श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचा संगम असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. उत्तर प्रदेशातील एका कुंभमेळ्यामुळे सुमारे 6 लाख रोजगार निर्माण झाल्याचा दाखला त्यांनी दिला.
'विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज' : काही प्रकल्पांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात, मात्र त्यातून दीर्घकालीन फायदे होतात, असं ते म्हणाले. येणाऱ्या कुंभमेळ्यात मागील वेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून सर्वांना उत्तम आध्यात्मिक अनुभव देण्याची तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकच्या विकासासाठी रिंग रोड, वाढवण बंदराशी कनेक्टिव्हिटी, निफाड ड्रायपोर्ट, सिन्नर थर्मल पॉवर आणि सिन्नर डिफेन्स क्लस्टर यांसारखे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी फळबाग लागवड, पीक संरक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, पुरवठा साखळी मजबूत करणे, एमआयडीसी अद्ययावत करणे, लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि पर्यटन विकास यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचं सांगितलं. एकूणच, कुंभ आणि उद्योग यांचा संगम साधत नाशिकला औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
'कुंभ आणि उद्योग यांचा संगम होणार' : धार्मिक पर्यटनासोबतच आर्थिक दृष्टीनंही याचा मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका कुंभमेळ्यानं सुमारे ६ लाख रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. कुंभमेळा हा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर चालण्या-रिती, संस्कृती आणि समाजाचा एकत्रित मेळ आहे. प्रत्येकाला गोदावरीत डुबकी मारण्याची आणि अमृतप्राशन करण्याची संधी मिळते. हा मेळा श्रद्धेचा अनुभव देतो.
नाशिकमध्ये रिंग रोडमुळे गुंतवणुकीच्या संधी वाढत चालल्या आहेत. काही ठिकाणी कुंभ करताना पर्यावरणाचा विचार करत झाडं तोडल्याचा नेरेटिव्ह मांडला जात आहे, परंतु विकास करताना कठोर निर्णय घेणं आवश्यक असतं. पर्यावरणाचा फायदा किती मिळेल, हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मागील कुंभापेक्षा यंदा पाचपट लोक येणार असून, सर्वांना त्रास न होता स्पिरिच्युअल अनुभव मिळेल. कमी वेळेत उत्कृष्ट कामगिरी केली जात आहे. ७५ वर्षांत एक चांगला योग या कुंभमध्ये प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, कुंभ आणि उद्योग यांचा संगम समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणणारा आहे आणि यामुळे आनंद वाटतो. उद्योगातून नाशिकचा विकास होईल. राज्यातील अशा प्रकारची पहिली परिषद नाशिकमध्ये होत आहे.
उद्योगातून नाशिकचा विकास होणार : जिल्ह्याची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन, पीक संरक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, पुरवठा साखळी बळकट करणं, एमआयडीसी अद्ययावत करणं, लहान उद्योगांना प्रोत्साहन, नाशिकचं ब्रॅंडिंग, सुविधा, पर्यटन विकास आणि वेगवेगळे उपक्रम राबविणं यांचा समावेश आहे. याशिवाय रिंग रोड, वाढवण बंदर, निफाड ड्रायपोर्ट, सिन्नर थर्मल पॉवर आणि सिन्नर डिफेन्स क्लस्टरमुळे नाशिकच्या विकासाला मोठी संधी मिळणार आहे, असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.

