मुंबईचा एक्यूआय: शहरातील अनेक भाग 'अस्वस्थ करणारा' गटात! हवेची गुणवत्ता 255 वर
दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईची हवादेखील विषारी होत चालली आहे. आज शहरातील अनेक भागात हवेचा दर्जा ‘अस्वस्थ करणारा’ या गटात नोंदवला गेला आहे.

Published : December 8, 2025 at 12:27 PM IST
मुंबई : दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता वर्षानुवर्षे खालावत चालली आहे. आता या यादीत आर्थिक राजधानी मुंबईचाही समावेश झाला आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीइतकीच वाईट होत चालल्याचं दिवसेंदिवस समोर येत आहे. आज सोमवारी (8 डिसेंबर) देखील शहरातील अनेक भागात हवेचा दर्जा ‘अस्वस्थ करणारा’ या गटात नोंदवला गेला आहे. सकाळी शहराचा एकूण एक्यूआय 200 ते 250 दरम्यान नोंदवला गेला, तर काही भागात तो 255 पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे.
गेल्या आठ दिवसांचा ट्रेंड: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध हवामान संकेतस्थळांच्या नोंदीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसांत मुंबईत एक्यूआय बहुतेक वेळा 100 ते 180 दरम्यान राहिला. तथापि, काही दिवशी एक्यूआय 200 च्या पुढे गेला. यामुळे मुंबईकरांवर प्रदूषणाचा परिणाम अधिक झाल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
- 1–ते 3 डिसेंबर: हवेचा दर्जा बहुतांश ठिकाणी 'मॉडरेट' (एक्यूआय 100 ते 150)
- 4–ते 6 डिसेंबर : तापमान घटल्यानं आणि वारं मंदावल्यानं हवेचा दर्जा 'पुअर' ते 'अनहेल्दी' (एक्यूआय 150 ते 180)
- 6 डिसेंबर : काही केंद्रांवर एक्यूआय 176 नोंदवला गेला.
- 7 डिसेंबर : शहरासाठी एकत्रित एक्यूआय सुमारे 158 ते 180 च्या दरम्यान होता, म्हणजेच मॉडरेट ते अनहेल्दी श्रेणीमध्ये होता.
- 8 डिसेंबर (आज) : सकाळी हवा पुन्हा 'अनहेल्दी' असल्याची नोंद झाली आहे. एक्यूआय अनेक भागांत 200 तर काही ठिकाणी 250 च्या वर होता.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या मानकांनुसार,
- 0 ते 50 दरम्यानचा एक्यूआय 'चांगला'
- 51-100 'समाधानकारक'
- 101-200 'मध्यम'
- 201-300 'खराब'
- 301-400 'अत्यंत वाईट'
- आणि 401-500 'गंभीर' मानला जातो.
हवामान तज्ज्ञांचं मत काय? : भारतीय हवामान तज्ज्ञ डॉ. चिन्मय खानोलकर यांच्या मते, मुंबईतील हिवाळ्यात हवेची गुणवत्ता सुरक्षीत राहण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक हवा-खेळती परिस्थिती सध्या कमी आहे. रात्रीचं तापमान झपाट्याने खाली येतं आणि सकाळी सूर्य उगवल्यावरही हवेच्या खालच्या थरात प्रदूषक अडकून राहतात. हलकं वारं, समुद्रकाठचा ओलसरपणा, वाहनं व बांधकामांमधून येणारी धूळ या प्रदुषणात आणखी वाढ होते.
वाहनांची संख्या, बांधकामं आणि रस्ते कामामुळे निर्माण होणारी धूळ यामुळे PM2.5 आणि PM10 कणांची पातळी सतत उच्च राहते. डॉ. खानोलकर यांनी सांगितलं की, मुंबईतील PM2.5 कणांची संख्या डब्ल्यूएचओच्या वार्षिक मार्गदर्शक मानकांपेक्षा 14-15 पट जास्त आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी एक्यूआय १२० च्या आसपास होती. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा सुमारे 148 होता. म्हणजेच, या वर्षी थोडी सुधारणा दिसली असली तरी, हवेतील प्रदूषण मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अजूनही धोकादायक आहे.
हेही वाचा

