नाशिकच्या कुंभमेळ्याची 50 हजार कोटींची कामे मंत्री महाजनांनी गुजरातच्या ठेकेदारांना दिली; खासदार संजय राऊतांचा आरोप
नाशिक कुंभमेळ्याची 50 हजारांची कामे मंत्री महाजन यांनी गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचा खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय.

Published : January 10, 2026 at 11:12 AM IST
नाशिक- आगामी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकमध्ये 50 हजार कोटींची कामं होणार आहेत, त्यासाठी सगळी कंत्राटं मात्र गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली, त्यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते. नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने 50 हजार कोटींची कामं निघाली असून, ती गुजरातच्या ठेकेदारांना मिळाली आहेत. त्याची यादी सर्वांसमोर आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने पंचवटी येथील तपोवनामध्ये दोन हजार झाडांच्या कत्तली करण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येवरती धर्मध्वज फडकावला, त्या धर्मध्वजावर झाडांचे चिन्ह आहे. पण भाजपाने तपोवनातील दोन हजार झाडे तोडली. ते काम ज्या बिल्डरला देण्यात आलं. तो बिल्डर भाजपाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांचा खर्च करणार असल्याची माहिती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
काय बोलले राऊत?- उद्धव आणि राज ठाकरे यांनी सभेसाठी नाशिकची निवड केली. नाशिक प्रभू श्रीराम, सावरकरांची भूमी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 50 हजार कोटींची कामे निघालीत. ती गुजरातच्या कंत्राटदारांना दिलीत. मंत्री गिरीश महाजन यांनी गुजरातच्या ठेकेदारांना कामे दिलीत. ती संपूर्ण यादी दिल्लीतून आली आहे. नाशिकची अवस्था लखनऊ आणि पाटण्यासारखी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था केली. शाळा आणि कॉलेजच्या टपरी बाहेर ड्रग्ज विकले जाताहेत. स्मार्ट सिटीचं काय झालं. तपोवनामध्ये दोन हजारांहून अधिक झाडे तोडलीत. बिल्डरांच्या सोयीसाठी दोन हजार झाडं तोडली. हा बिल्डर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा खर्च करणार आहे, अशी माहिती आहे. शिवशक्तीमध्ये नाशिकचं परिवर्तन करण्याची ताकद आहे. ज्यांनी नाशिकला लुटलं त्यांना आपण कायमचे घरी पाठवू, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं.
आमच्या काळात उत्तम कुंभमेळा झाला- देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतलंय. आम्ही जी कामं केली, ती सर्व लोक विसरलीत. दत्तक घेणारा बाप परत नाशिकला फिरकला नाही. आमच्या वेळी कुंभमेळा झाला, त्यात एकही झाड कापलं गेलं नाही. मग आता का झाडं कापतात. उत्तम कुंभमेळा झाला म्हणून जगभरात कौतुक झालंय. उद्योगपतींसाठी तपोवनातील झाडे तोडली जात आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
आमच्या काळात हे आम्ही केलं - नाशिक शहराला मुकणे धरणापासून पाईपलाईन आणून नाशिकचा पाण्याचा प्रश्न सोडवला, जीपीएसने घंटागाड्या सुरू केल्या. घन कचरा प्रकल्प सुरू केला. बोटॅनिकल गार्डन केलं, रतन टाटांनी 15 कोटी रुपये टाकले होते, ते सर्व सत्ताधाऱ्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. महानगरपालिकेवर 700 कोटी रुपये कर्ज होतं. ते आम्ही कर्जमुक्त केलं. आमच्या काळात एकही भ्रष्टाचार झाला नाही. लाडकी बहीण योजनेमधून दीड हजार दिले, ते कुठे पुरणार. आज पैसे घ्याल किती दिवस पुरणार आहे. आपण मुलांचे भविष्य दावणीला लावत आहोत. आज आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही चमत्कार करून दाखवू. 100 नगरसेवक निवडून आले पाहिजेत, असा मला विश्वास द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केलंय.
हेही वाचाः
'ते डोकी भडकवतील तुम्ही शांत रहा; लक्षात ठेवा, सर्वांच्या सोबतीनंच शहराचा विकास शक्य,' अजित पवारांचं आवाहन
भाजपानं स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून चंद्रपूरच्या विकासाचं वाटोळं केलं: विजय वडेट्टीवारांचा घणाघात

