आता बोंबला; भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी वाटली गुजराती पत्रकं, मनसे मैदानात
नवी मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांनी गुजराती पत्रकं वाटल्यानं मोठी खळबळ उडाली. मनसे नेत्यांनी मराठी राजभाषा आणि प्रचार गुजरातीतून असा खोचक हल्लाबोल भाजपावर केला आहे.

Published : January 8, 2026 at 5:32 PM IST
|Updated : January 8, 2026 at 10:53 PM IST
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या प्रचारासाठी भाजपा उमेदवारांनी गुजराती भाषेत प्रचार पत्रकं वाटल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे. मग ही गुजराती भाषेत पत्रकं वाटण्याचा प्रकार कोणाच्या लांगूनचालनासाठी चालला आहे, असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला.

भाजपा तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याच्या तयारीत : "नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी नवी मुंबईतं भाजपा तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे," असं वक्तव्य मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं. त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेचा उल्लेख गद्दार सेना असा केला. "भाजपा आणि शिवसेना तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढत आहेत. कुठलंही व्हिजन न घेता, भाजपा आणि शिवसेना दोन पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत रणांगणात उतरले आहेत. कंत्राटदार आणि त्यातून झालेले नगरसेवक, अधिकाऱ्यांची मिली भगत यामुळे कुठलाही प्रकल्प राबवताना भ्रष्टाचार होतं आहे," असंही गजानन काळे यांनी यावेळी सांगितलं.
भाजपा उमेदवारांची गुजराती प्रचार पत्रकं : "मनसेचा जाहीरनामा राबवताना एक हे तो सेफ है असा उल्लेख करत मराठी माणसाला उबाठा आणि मनसेला मतदान करण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली. भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशाप्रकारे कत्तल करतोय याचे अनेक प्रकार महाराष्ट्रातील विविध शहरात आपण पाहिलेले आहेत. भाजपा उमेदवारांनी कशाप्रकारे गुजराती भाषेत प्रचार पत्रकं वाटली," याचा देखील उल्लेख गजानन काळे यांनी केला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं बोलत आहेत, मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे. मग हे सगळे गुजरातीत पत्रकं वाटण्याचे प्रकार कोणाच्या लांगूनचालनासाठी चालला आहे," असं देखील वक्तव्य काळे यांनी केलं. "नवी मुंबईची ओळख आगरी कोळ्यांचं शहर असं आहे. इथल्या मराठी माणसाचं शहर अशी आहे. मात्र त्या शहराची ओळख पुसण्याचा प्रकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून सुरू आहे."
दुबार मतदान यादीवर ओढले ताशेरे : नवी मुंबईतील दुबार मतदार यादीवर देखील काळे यांनी ताशेरे ओढले. आयुक्त आणि त्या अदृश्य मिस्टर इंडिया असणाऱ्या मतदारांना या यादी पाठवाव्यात अन्यथा यादी पुरवण्याचा कार्यक्रम मनसे आणि उबाठा पक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल, असंही काळे यांनी सांगितलं.
हेही वाचा :

