महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अटक; मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्या पत्नीला पाटण्यात ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात, सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्या पत्नीला पाटण्यातून अटक करण्यात आली आहे.

Published : June 30, 2026 at 1:01 PM IST
पाटणा - महाराष्ट्र टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला पाटण्यातून अटक केली आहे. अटकेनंतर, पेपरफुटीमधील तिच्या सहभागाबाबत पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे, बिजेंद्र गुप्ता हा मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून, त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दिल्ली, हरियाणा, आग्रा आणि बिहारमध्ये छापे टाकत आहेत.
प्रश्नपत्रिका फुटीमध्ये पत्नीचा सहभाग? - महाराष्ट्र पोलिसांकडून मिळाली माहिती आणि पाटणा पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील पाटणा इथं सुमन कुमारीला अटक करण्यात आली आहे. सध्या एक पथक तिची चौकशी करत आहे. या चौकशीतून असं समोर आलं आहे की, महाराष्ट्रातील प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये सुमन कुमारीचा सहभाग होता. टीईटी (TET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर, सुमन कुमारी या पती विजेंद्र कुमार गुप्ता आणि या कारस्थानात सामील असलेल्या नेटवर्कमधील इतर सदस्यांच्या संपर्कात होत्या, असा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? : याआधी महाराष्ट्र पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील एका महत्त्वपूर्ण कारवाईत, पोलिसांनी पाटणा येथून राजीव साव आणि आकाश कुमार यांना अटक केली. याव्यतिरिक्त, हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेल्या धीरज कुमारलाही ताब्यात घेण्यात आलं. या तिन्ही आरोपींच्या कसून केलेल्या चौकशीतून मुख्य सूत्रधार म्हणून विजेंद्र गुप्ता याचं नाव प्रामुख्यानं समोर आलं आहे.
मुख्य सुत्रधार विजेंद्र गुप्ता अद्यापही फरार : पेपर फुटीच्या संपूर्ण नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असलेल्या विजेंद्र गुप्ताचा शोध सुरूच आहे. पोलीस तपासात तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्र, बिहार आणि शेजारील अनेक राज्यांतील पोलीस दलांची पथकं त्याच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर सातत्यानं छापे टाकत आहेत. आरोपी विजेंद्र हा समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर गावचा रहिवासी आहे.
हेही वाचा..

