मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
सभेला बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त असल्याचं पाहून मला प्रचंड समाधान मिळतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धुळ्यात पुन्हा भगवे राज्य आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Published : January 6, 2026 at 6:45 PM IST
|Updated : January 6, 2026 at 7:23 PM IST
धुळे - सभेला बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त असल्याचं पाहून मला प्रचंड समाधान मिळतं. गिरीश महाजन फक्त राजकारणातील आकडे काढतात, पण त्यांनी फक्त धुळ्याचे आकडे न काढता आमचेही आकडे काढावेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीतून विरोधकांना टोला लगावला. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत त्यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडत धुळ्यात पुन्हा भगवे राज्य आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही - सभेला बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त असल्याचं पाहून मला प्रचंड समाधान मिळतं. गिरीश महाजन फक्त राजकारणातील आकडे काढतात, पण त्यांनी फक्त धुळ्याचे आकडे न काढता आमचेही आकडे काढावेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीतून विरोधकांना टोला लगावला. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत त्यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडत धुळ्यात पुन्हा भगवे राज्य आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
मागच्यावेळी माझ्या शब्दाला मान देत महापालिकेत सहकार्य दिलं. आता चार नगरसेवक बिनविरोध आले म्हणून काहींना मिरची लागली आहे. तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू? अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का? मग धुळे महापालिकेत चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर लगेच लोकशाही धोक्यात कशी आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २००३ मध्ये स्थापन झालेल्या धुळे महापालिकेला भाजपाच्या काळातच खऱ्या अर्थानं विकास पाहायला मिळाल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले, अक्कलपाडा योजनेचं ७० टक्के काम पूर्ण झालं आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच मी धुळ्यात आलो आहे.
केंद्र सरकारच्या कामगिरीवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, ७० वर्षे देशाकडे कोणी लक्ष दिलं नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि देशाचा विकास वेगाने सुरू झाला. देशाच्या इतिहासात प्रथमच अनेक योजना सुरू झाल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना मिळाले. ग्रामीण भागांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, असंही त्यांनी नमूद केलं. धुळे शहरातील गरीब तसंच अतिक्रमणात राहणाऱ्या नागरिकांसाठीही सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर करत मुख्यमंत्री म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी आम्ही निर्णय घेतला असून अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून देणार आहोत. धुळ्यासाठी ११७ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना मंजूर असून आतापर्यंत या योजनेचं २० टक्के काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. धुळे व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी गोंदूर विमानतळाचं विस्तारीकरण करून उद्योग आणण्याचा मानस व्यक्त करत ते म्हणाले, जिथे विमानतळ असते, तिथेच उद्योग येतात. धुळ्यातील विमानतळाची धावपट्टीही येणाऱ्या काळात मोठी केली जाणार आहे.
'लाडकी बहीण' योजनेबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितलं की, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना 'लखपती दीदी' करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. भावी नगरसेवकांना उद्देशून त्यांनी जबाबदारी सोपवत येणाऱ्या काळात सर्व लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं आवाहन केलं. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार काशीराम पावरा, आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या धरती देवरे, प्रदेश संघटन महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, दोंडाईचा नगराध्यक्ष नयनकुवर रावल, शिरपूर नगराध्यक्ष चिंतन पाटील, पिंपळनेर नगराध्यक्ष डॉ. योगिता चौरे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नारायण भाऊसाहेब पाटील, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल, प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, उद्योजक विनोद अग्रवाल, सुभाष देवरे, गोपाल केले, डॉ. माधुरी बोरसे, गुलशन उदासी, कांतीलाल चोरडिया, महादेव परदेशी, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, भिकन वराडे, संजय शर्मा, हिरामण गवळी आदींसह मोठ्या संख्येनं महिला तसंच नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा...

