कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : "निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही", उमेदवारांनी स्टॅम्पवरचं लिहून दिलं
मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी उमेदवारांनी दिलेलं हे प्रतिज्ञापत्र मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


Published : January 9, 2026 at 3:45 PM IST
|Updated : January 9, 2026 at 7:29 PM IST
कोल्हापूर : राज्यभरात महापालिका निवडणुकांची 'लगीनघाई' सुरू आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आश्वासनांचा पाऊस पाडतोय. मात्र कोल्हापुरातील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखं शपथपत्र ठेवून महानगरपालिका निवडणुकीत,"मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही. मतदारांसाठी 24 तास उपलब्ध असेल आणि निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नाही," असं 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिलंय. दरम्यान, मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी उमेदवारांनी दिलेलं हे प्रतिज्ञापत्र मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
आम आदमी पक्षाचे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. या आघाडीत आम आदमी पक्षाचे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरची लढाई लढत कोल्हापूरकरांचे अनेक प्रश्न सभागृह संपल्यानंतर आणि प्रशासक काळात लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तिसरी आघाडी स्थापन : राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पक्षाला कोल्हापुरात काँग्रेसनं डावल्यानंतर तिसरी आघाडी स्थापन करत वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 23 तर वंचित आघाडी सात जागांवर निवडणूक लढवत आहे. या तिन्ही पक्षांची मिळून राजर्षी शाहू आघाडी निवडणुकीच्या मैदानात असल्यानं आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी आपल्या चौथ्या उमेदवारांसाठी प्रतिज्ञापत्र देत असल्याची घोषणा आज कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी उमेदवार उत्तम पाटील, अभिजीत कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकहिताचा स्टॅम्प प्रभागातील मतदारापर्यंत पोहोचवणार : "कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभाराला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. वराळे नावाच्या कंत्राटदारानं महापालिकेच्या दारात येऊन कोण अधिकारी किती पैसे घेतो, हे जाहीर केलं होतं. मात्र तरीही पुढं कोणतीही कारवाई न झाल्यानं संतापलेल्या आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार मुक्त कारभार हा अजेंडा समोर ठेवून मतदारापर्यंत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वरील हे प्रतिज्ञापत्र पोहोचवणार आहे," असं प्रभाग क्रमांक 20 मधील आम आदमी पक्षाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तृतीयपंथी उमेदवार शिवानी गजबर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
- "देवेंद्र फडणवीसांची इच्छा चांगली, पण...", मुंबईच्या मुद्द्यांवर काय म्हणाले राज ठाकरे?
- मंत्री गणेश नाईक यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, शिंदे म्हणाले 'चोराच्या उलट्या बोंबा'
- 'निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करू नये', रद्द केलेली उमेदवारी स्वीकारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

