'मध्यपूर्वेत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच आणणार मायदेशी' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एकनाथ शिंदे . . .'
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे अनेक मराठी नागरिक मध्यपूर्वेत अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Published : March 4, 2026 at 4:41 PM IST
मुंबई : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. लवकरच सर्वांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी आणलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

इराण–इस्रायल संघर्षानंतर काही देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटक, विद्यार्थी तसेच नोकरी-व्यवसायासाठी गेलेले अनेक महाराष्ट्रीय नागरिक परतीच्या प्रवासात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकारशी समन्वय साधत मदतकार्य सुरू केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्यानं संपर्क : याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्यानं संपर्क ठेवण्यात येत असून अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडं या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते संबंधित यंत्रणांशी संपर्कात आहेत. गरज भासल्यास विशेष उड्डाणांची व्यवस्था करण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. काही देशांमध्ये व्हिसा आणि प्रवासासंबंधी अडचणी निर्माण झाल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यानंतर परतीची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी मंडळं आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थाही या प्रक्रियेत मदत करत आहेत. सरकारच्या व्हाट्स अॅप नंबरवर नागरिकांनी संपर्क करून संवाद साधावा, यावरून नागरिकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला आणणार मायदेशात : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या मुलाला परत आणण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. त्यावरही शासनानं सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. "नागरिकांनी घाबरून न जाता शासनाशी संपर्कात राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्य व केंद्र सरकार मिळून सर्वांना सुरक्षित परत आणण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत त्यांनी पुढाकार घेत पक्षाच्या वतीनं दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना काल परत आणलं, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
हेही वाचा :
- लाइव्ह US Israel Iran War Live Updates : 'राजवटीच्या क्षमता नष्ट करण्यासाठी पूर्ण शक्तीनं कार्य करत राहू'-इस्रायलचे संरक्षण मंत्री
- इराण-इस्रायल संघर्ष : भारतानं स्थापन केला विशेष नियंत्रण कक्ष, देशनिहाय हेल्पलाइन क्रमांक जारी
- इराण-इस्रायल संघर्ष : भारताच्या तेलपुरवठ्यावर परिणाम, रशियानं दिली तेल पुरवण्याची मोठी ऑफर

