गोदावरीचं पाणी कोपरगावात : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन, अकोले तालुक्यातील शाळांना सुट्टी
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यातच भारतीय हवामान विभागानं अकोले तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.


Published : July 8, 2026 at 6:19 PM IST
शिर्डी : गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. धरणांमधून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे गोदावरीचं पाणी कोपरगाव परिसरात दाखल झालं असून नदीतील पाण्याची आवक सातत्यानं वाढत आहे. पाण्याची पातळी वाढल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोले तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झाली पूरस्थिती : राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोपरगाव परिसरातही दिसून येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणं टाळावं, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

अकोले तालुक्यासाठी अतिवृष्टीचा इशारा : भारतीय हवामान विभागानं अकोले तालुक्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं आज बुधवारी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोले तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती तसेच इतर नैसर्गिक आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये यापूर्वीच अतिवृष्टी झाल्यानं स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 25 अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सुट्टीच्या दिवशी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करावं असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा :
- नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ
- 'मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला करू नका!'; पावसाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
- इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना नदीत स्नानास बंदी

