ETV Bharat / state

शिर्डीत कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा! जर्मनीहून आलेल्या साईभक्ताची दागिने अन् व्हिसा असलेली पर्स केली सुखरूप परत

जर्मनीहून शिर्डीला आलेल्या साईभक्ताची दीड लाखांचे सोन्याचे दागिने, व्हिसा असलेली हरवलेली पर्स येथील स्वच्छता कर्मचारी उत्तम चाबुकस्वार यांनी सुरक्षा विभागात जमा करून परत मिळवून दिली.

SHIRDI SAI TRUST EMPLOYEES HONESTY
शिर्डीत कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 4, 2026 at 4:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - जगभरातून लाखो भाविक श्रद्धेनं येणाऱ्या शिर्डी साईबाबा मंदिराची ओळख केवळ अध्यात्मासाठीच नाही तर स्वच्छता, शिस्त आणि सेवाभावासाठीही आहे. या व्यवस्थेच्या पाठीशी असणाऱ्या अहोरात्र काम करणाऱ्या साईबाबा संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानं पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. मंदिर परिसरात सापडलेली सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, व्हिसा आणि महत्त्वाची कागदपत्रं असलेली पर्स कर्मचाऱ्यानं कोणताही मोह न बाळगता संबंधित विदेशी साईभक्ताला सुखरूप परत करून प्रामाणिक सेवेचं दर्शन घडवलं आहे.

भाविकाला सुरक्षा विभागात मिळाली पर्स - जर्मनीमध्ये वास्तव्यास असलेले साईभक्त धनुष हे आपल्या कुटुंबासह पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आले होते. साईदर्शनानंतर काहीवेळ मंदिर परिसरात विश्रांती घेतल्यानंतर ते तेथून निघून गेले. मात्र, घाईगडबडीत त्यांची पर्स तिथंच विसरली. या पर्समध्ये बाळाचे सुमारे किंमत दीड लाख रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. त्याचबरोबर व्हिसा, ओळखपत्रं आणि इतर महत्त्वाची कागदपत्रंही होती. अवघ्या तीन दिवसांनी जर्मनीला परतण्याचा प्रवास असल्यानं पर्स हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबाची मोठी धावपळ सुरू झाली. मौल्यवान दागिन्यांसोबतच व्हिसा आणि महत्त्वाची कागदपत्रं हरवल्यामुळं त्यांची चिंता अधिकच वाढली होती. याचवेळी धनुष यांनी परिसरातील काही कर्मचाऱ्यांना आपली पर्स हरवल्याची माहिती दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षा विभागात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. मंदिर परिसरात भाविकांच्या हरवलेल्या वस्तू कर्मचारी प्रामाणिकपणे सुरक्षा विभागाकडं जमा करत असतात, अशी माहिती दिली. त्यानंतर भाविक सुरक्षा विभागात गेले. यानंतर तिथं त्यांना त्यांची हरवलेली पर्स मिळाली.

'ईटीव्ही भारत'शी बोलताना उत्तम चाबुकस्वार (ETV Bharat Reporter)

पर्स मिळाल्यावर धनुष अन् परिवाराच्या चेहऱ्यावर दिसला आनंद - साईबाबा संस्थानच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी उत्तम चाबुकस्वार मंदिर परिसरात साफसफाई करत होते. त्यावेळी त्यांना धनुष यांची पर्स आढळली. त्यांनी काहीवेळ त्या परिसरात थांबून पर्सचा मालक परत येतो का? याची वाट पाहिली. मात्र कोणीही न आल्यानं कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती तत्काळ संस्थानच्या सुरक्षा विभागाकडं जमा केली. सुरक्षा विभागानं पर्समधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित साईभक्तांचा शोध घेत असतानाच भाविकांनी सुरक्षा विभागात संपर्क साधला. त्यानंतर सर्व सोन्याचे दागिने, व्हिसा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेली पर्स परत मिळाल्यानंतर विदेशी साईभक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.

हा अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही - "बाळाच्या जन्मानंतर आजी-आजोबांनी प्रेमानं दिलेली सोन्याची मनगटी आणि गळ्यातील चैन या पर्समध्ये होत्या. तसंच आम्ही जर्मनीमध्ये वास्तव्यास असल्यानं त्यात आमचा व्हिसा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं होती. ती हरवल्यानं आम्ही पूर्णपणे निराश झालो होतो. मात्र, संस्थानच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळं सर्व वस्तू सुरक्षित परत मिळाल्या. हा अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही," अशी भावना साईभक्त धनुष यांनी व्यक्त केली.

सापडलेली वस्तू मालकापर्यंत पोहोचवणं हेच आमचं कर्तव्य - स्वच्छता कर्मचारी उत्तम चाबुकस्वार यांनीही आपल्या कर्तव्य भावनेचं दर्शन घडवत, 'सापडलेली वस्तू तिच्या मालकापर्यंत पोहोचवणं हेच आमचं कर्तव्य आहे', अशी साधी पण मोलाची प्रतिक्रिया दिली. या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी उत्तम चाबुकस्वार यांचं कौतुक केलं. तसंच सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि टिफिन बॉक्स देऊन सत्कार करण्यात आला.

साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा - साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. साईबाबांच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा हा आणखी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. गेल्या वर्षभरात साईबाबा मंदिर परिसरात तब्बल 90 लाख रुपयांच्या आसपास भाविकांच्या हरवलेल्या वस्तू कर्मचाऱ्यांना मिळून आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी त्या प्रामाणिकपणे सुरक्षा विभागात जमा केल्या आहेत. ज्या भाविकांच्या त्या वस्तू होत्या. त्यांना त्या सुखरूप परत देण्यात आल्या आहेत. यावरून साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

हेही वाचा :

  1. मानवनिर्मित चुका झाडांच्या मुळांवर, मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ का होतेय?
  2. घरात घुसून तरुणीचं अपहरण : बंदुकीचा धाक दाखवत नराधमाची कुटुंबीयांना मारहाण; रोख रक्कम, दागिने लंपास
  3. महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य; मात्र प्रीपेड मीटरचा पर्याय ग्राहकांसाठी ऐच्छिक