81 वर्षानंतरही हिरोशिमाची जखम ताजीच; अणवस्त्रांच्या सावटाखाली जग पुन्हा उभं !
6 ऑगस्ट 2026 रोजी हिरोशिमावरील आण्विक बॉम्बहल्ल्याला आणि 9 ऑगस्ट 2026 रोजी नागासाकीवरील आण्विक बॉम्बहल्ल्याला 81 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Published : August 6, 2026 at 9:54 AM IST
|Updated : August 6, 2026 at 2:38 PM IST
अमरावती : एका क्षणात संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. लाखो लोक मृत्युमुखी पडू शकतात. अनेक पिढ्या किरणोत्सर्गानं कठीण परिस्थितीत जगू शकतात, हे जगानं 6 ऑगस्ट 1945 रोजी प्रथम पाहिलं. अमेरिकेनं जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बनं केवळ एक शहर उद्ध्वस्त केलं नाही, तर संपूर्ण मानव जातीलाच युद्धाच्या नव्या आणि भयावह पर्वाची जाणीव करून दिली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी 9 ऑगस्टला नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
हिरोशिमा-नागासाकी अणुस्फोट घटनेला 81 वर्ष पूर्ण : आज या घटनेला 81 वर्ष पूर्ण होत असताना जग पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या धोक्याच्या उंबरठ्यावर उभं असल्याची चिंता व्यक्त होत आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावरून निर्माण झालेला संघर्ष, महासत्तांमधील वाढती स्पर्धा आणि अणवस्त्र सज्ज राष्ट्रांची वाढती ताकद पाहता हिरोशिमा, नागासाकीचा इतिहास आजही तितकाच बोलका ठरतो. एकूणच अणुबॉम्बचा इतिहास आणि आजची परिस्थिती या संदर्भात इतिहास आणि भौतिक शास्त्राचे अभ्यासक वैभव मस्के यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली.
महर्षी कणादांपासून सुरू झालेला आणूशक्तीचा विचार : अणुमध्ये प्रचंड ऊर्जा दंडलेली असल्याची कल्पना भारतातील महर्षी कणाद यांच्या तत्त्वज्ञानात आढळते. आधुनिक विज्ञानानं या विचाराला नवरूप दिलं असं प्रा. डॉ. वैभव मस्के सांगतात. 1905 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या E =mc 2 या सिद्धांतामुळं पदार्थातील ऊर्जेचा स्पष्टीकरण मिळालं. याच सिद्धांतावर पुढं अणुबॉम्ब निर्मितीची संकल्पना विकसित झाली.
मॅनहॅटन प्रकल्प : दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं अत्यंत गुप्तपणे मॅनहॅटन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात रॉबर्ट ओपनहायमर, नेल्स बोहर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र संशोधन केलं. अखेर 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ट्रीनिटी या ठिकाणी पहिली यशस्वी अणुचाचणी पार पडली. त्या क्षणापासून जग अणुयुगात पोहोचलं, असं प्रा. वैभव मस्के यांनी सांगितलं.
दोन स्फोटांनी बदलला जगाचा इतिहास : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला होता. पण, जपान अजूनही शरण येत नव्हता. अखेर अमेरिकेनं 6 ऑगस्ट 1945 रोजी लिटिलबॉय हा अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकला. त्यानंतर काही क्षणात शहर राख झालं. त्यानंतर 9 ऑगस्ट 1945 रोजी फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला. या दोन स्फोटानंतर जपाननं शरणागती पत्करल्यानंतरच दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. मात्र, लाखो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनं हा हल्ला अत्यंत क्रूर मानला जातो.

अणवस्त्रांच्या स्पर्धेला सुरुवात : हिरोशिमा आणि नागासाकीनंतर जगानं आण्विक अस्त्रांच्या निर्मितीच्या शर्यतीला सुरुवात केली. अमेरिका, रशिया, चीन, फ्रांस, ब्रिटन यांच्यासह अनेक देशांनी अण्वस्त्र विकसित केली. त्यानंतर अणुबॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब विकसित झालेत. शास्त्रज्ञांच्या मते आज अस्तित्वात असलेली अण्वस्त्रे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचा अनेक वेळा विनाश करू शकतील, इतकी त्यांची क्षमता आहे, असं प्रा.डॉ. वैभव मस्के सांगतात.
भारताची अशी आहे अणुनीती : भारतानं 1974 मध्ये पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. त्यानंतर 1998 मध्ये पुन्हा यशस्वी आणू चाचण्या करून संरक्षण क्षमता अधिक मजबूत केली. भारतनं अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, संशोधन आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. तामिळनाडूमधील कल्पक्कम येथे 'कामिनी' ही पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित अणुभट्टी हे त्याचंच उदाहरण आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना हा प्रकल्प सुरू झाला, असं प्रा.डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.
नवीन अणवस्त्र रोखण्यासाठी सुरू आहे जागतिक संघर्ष : आज इराणच्या अणु कार्यक्रमावरून जगातील महासत्तांमध्ये संघर्ष सुरू आहे. इराणवस्त्र विकसित करू नयेत, यासाठी अमेरिका आणि तिचे सहयोगी देश निर्बंध, राजकीय दबाव आणि लष्करी कारवाया इराणविरुद्ध करत आहेत. यापूर्वी भारताला ही सीटीबीटी सारख्या करारांद्वारे अणुचाचण्यांपासून रोखण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतानं स्वतंत्र भूमिका घेत संरक्षण क्षमता विकसित केली.
अणुशक्ती विकासासाठी की विनाशासाठी? : अणुशक्ती ही वाईट नाही. तिचा उपयोग वीज निर्मिती, वैद्यकीय संशोधन, शेती आणि विज्ञानाच्या प्रगतीसाठी झाला तर ती मानवतेसाठी वरदान ठरू शकते, असं मत प्रा,डॉ. वैभव मस्के यांनी व्यक्त केलं. परंतु युद्धासाठी अण्वस्त्रांचा वापर झाला तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. त्यामुळं विज्ञानाचा उपयोग अन्न, वस्त्र, निवारा आणि मानव कल्याणासाठी व्हावा. विनाशकारी शस्त्र स्पर्धेसाठी नव्हे हीच काळाची गरज आहे असं प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.
हे आहेत अणवस्त्रधारी प्रमुख देव : सध्या जगात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्रायल ही अण्वस्त्रधारी देश मानली जातात. या राष्ट्रांकडे असलेल्या अण्वस्त्रांमुळं जागतिक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
हिरोशिमा, नागासाकीचा विचार म्हणजे जग धोक्यात : हिरोशिमा आणि नागासाकी ही केवळ दोन शहरांची कथा नाही. ती विज्ञान, सत्ता आणि युद्ध यांच्या सीमारेषा दाखवणारा इतिहास आहे. 81 वर्षानंतरही त्या राखेतून एकच संदेश ऐकू येतो, तो म्हणजे युद्धात कोणताही देश जिंकत नाही. युद्धात संपूर्ण मानव जातीचा पराभव होतो.
हेही वाचा -

