कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 30 वर्षाच्या बँक कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Published : February 23, 2026 at 6:10 PM IST
|Updated : February 23, 2026 at 6:18 PM IST
ठाणे – 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं पायाला चावा घेतल्यान त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर सुसाईड नोट लिहून त्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली आहे. आयश विश्वनाथ अमीन ( वय 30 ) असे मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.
श्वान चावल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीनं गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये पोलिसांना आढळून आलं आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 903 मध्ये परिवारासह राहत होते. आयश हे गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरीला होते. त्यातच काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात भटक्या कुत्र्यानं आयश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचं सांगण्यात आले. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत होता, असे नातेवाईकांनी सांगितलं आहे.
पूर्ण लसीकरण वेळेत घेणं अत्यावश्यक- रविवारी सायंकाळच्या सुमरास घरात कोणीही नसताना अमीन यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी या दुदैवी कुटुंबियांची भेट घेवून त्यांचं सात्वन केलं. त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. ही घटना अत्यंत वेदनादायक असून नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण (Anti-Rabies Vaccine) वेळेत घेणं अत्यावश्यक आहे.
समुपदेशनाची मदत घेणंही महत्त्वाचं- वैद्यकीय तज्ञांच्या मते, योग्यवेळी पूर्ण उपचार घेतल्यास रेबिज पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तसेच, कुत्रा चावल्यानंतर भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मानसिक तणाव वाढल्यास कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीला भावनिक आधार देणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशनाची मदत घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण- भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं प्रभावी उपाययोजना करणे, तसेच नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवक महेश गायकवाड यांनी या व्यक्त केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अमिन याच्या पश्चात एक भाऊ आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.
रेबीजच्या लसीकरणाबाबत सतर्क राहावं- या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडं पाठवून दिला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांचा वावर आणि रेबीजच्या लसीकरणाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
(जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन - 9152987821 सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते 10 पर्यंत उपलब्ध आहे.)
हेही वाचा-

