प्रसिद्ध यूट्यूबर डॉ संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात, भाजपा नेत्याच्या मानहानी प्रकरणी चौकशी
भाजप नेत्याच्या मानहानीच्या प्रकरणात एनआरआय डॉक्टर-यूट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आल.

By PTI
Published : January 10, 2026 at 8:31 PM IST
मुंबई - लंडनस्थित डॉक्टर आणि लोकप्रिय यूट्यूबर संग्राम पाटील यांना एका भाजपा पदाधिकाऱ्यानं दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात शनिवारी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
डॉ. संग्राम पाटील यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं, असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यांना अटक करण्यात आली नसल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम ३५(३) अंतर्गत या कलमानुसार, ज्या प्रकरणांमध्ये शिक्षेचा कालावधी कमी असतो, अशा काही प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावणे बंधनकारक आहे.
"डॉ. संग्राम पाटील लंडनहून आल्यानंतर त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली आणि प्राथमिक तपासानंतर त्यांना सोडून देण्यात आलं," असं संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
ही कारवाई भाजपच्या मीडिया सेलचे पदाधिकारी निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या प्रकरणासंदर्भात करण्यात आली आहे. संग्राम पाटील यांनी सत्ताधारी पक्षाबद्दल खोटी माहिती पसरवली आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली, असा आरोप भामरे यांनी केला आहे.
दरम्यान पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं, “मी फेसबुकवर लिहित असतो, त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तक्रार करत एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतलं होतं. आज दिवसभर चौकशी करून आता मला नोटीस दिली आणि आता पुढील तपास सुरू झाला आहे. कोणत्यातरी एका राजकीय ग्रुपची एक पोस्ट आहे आणि त्याबरोबर मला क्लब करून टाकलं आहे. मात्र, यावर मी आता जास्त काही बोलणार नाही. चौकशीतून योग्य ते समोर येईल”.
दरम्यान ज्येष्ठ वकील असिम सरोदे यांनी यासंदर्भात डॉ. संग्राम पाटील यांना गरज भासल्यास सर्व कायदेशीर मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांना ताब्यात घेणं हे अन्यायकारी असल्याची टीकाही सरोदे यांनी केलीय.

