होळी साजरी करण्याबाबत संभ्रम, मात्र 'या' तारखेला असेल होलीका दहन सणाची सुरुवात
वेद अभ्यासकांनी माहिती प्रसिद्ध करून कुठलाही संभ्रम न ठेवता 2 मार्च रोजीच होलीका दहण म्हणजेच होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात करण्याचं आवाहन केलं आहे.

Published : February 23, 2026 at 3:06 PM IST
|Updated : February 23, 2026 at 3:22 PM IST
छत्रपती संभाजीनगर - होळीचा सण काही दिवसांवर आला असताना कोणत्या दिवशी नेमका सण साजरा केला जाईल याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. काही ठिकाणी 2 मार्च रोजी तर काही ठिकाणी 3 मार्च रोजी होलीका दहन होईल अशी माहिती समाज माध्यमांवर सांगितली जात आहे. मात्र त्यावर वेद अभ्यासकांनी माहिती प्रसिद्ध करून कुठलाही संभ्रम न ठेवता 2 मार्च रोजीच हा सण साजरा करण्यास सुरुवात करण्याचं आवाहन केलं आहे. 4 मार्च रोजी असलेलं ग्रहण आणि पूर्वी लागणारी पौर्णिमा यांची माहिती घेतली तर सण साजरा करण्याबाबत स्पष्टता येईल. धर्मसिंधु नुसार 2 मार्च रोजी होलीका दहन करणे योग्य राहील अशी माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी दिली.
होलीका दहन 2 मार्च रोजी - होळी साजरी करताना नेमकी कधी करावी यात शंका न घेता दिनांक 2 मार्च 2026 रोजी सोमवारी होळी साजरी करावी अशी माहिती अनंत पांडव गुरुजी यांनी दिली. फाल्गुन शुद्ध चतुर्दशी सायंकाळी पाच वाजून 56 मिनिटापर्यंत आहे. त्यानंतर प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे. तीन तारखेला पौर्णिमा सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटापर्यंत आहे, म्हणजेच साडेतीन प्रहरापेक्षा पौर्णिमा कमी असल्यामुळे दोन तारखेला होलीका दहन करणे शास्त्र वचन आहे. दुसरे कारण म्हणजे, तीन मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण देखील आहे आणि प्रदोष काल सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यानं दोन मार्च 2026 रोजीच होलिका दहन करावे असा धर्मसिंधू मधील निर्णय असल्याची माहिती अनंत पांडव गुरुजी यांनी दिली.
धुरंडी देखील एक दिवस आधीच - "इदं चंद्रग्रहणसत्वे वेध मध्ये कार्यं ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमत्वे ग्रहणमध्य एव कार्यम्। अन्यथा पूर्वदिने। धर्मसिंधु| दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून 56 मिनिट ते पहाटे पाच वाजून 29 मिनिटापर्यंत भद्रा आहेत, दोन मार्च रोजी प्रदोष काळात भद्रा असताना देखील आपण होलिका दहन निश्चित करावे असे शास्त्र वचन आहे. ग्रहण आणि पौर्णिमा यांचा विचार करून त्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. त्यानंतर 3 मार्च रोजी धुरंडी धुलिवंदन नित्य नियमानुसार करू शकतो. शास्त्रानुसार दिलेले मुहूर्त असल्याने त्यामध्ये शंका निर्माण होणार नाही. समाज माध्यमांवर येणारी वेगवेगळ्या प्रकारची माहिती तपासून घेतली पाहिजे. कारण माहिती प्रसिद्ध करणारा अभ्यासक असेल याची शाश्वती नसते. अनेकवेळा ऐकीव माहितीवरून देखील काही मजकूर प्रसिद्ध केला जातो. त्यामुळे अशावेळी अभ्यासकांसोबत चर्चा करणे योग्य राहील असं आवाहन ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी केलं.
हेही वाचा...

