राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनी चढली शिवसेना भवनची पायरी, उद्धव ठाकरे म्हणाले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनमध्ये आले. यावरुन उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Published : January 4, 2026 at 1:37 PM IST
|Updated : January 4, 2026 at 1:46 PM IST
मुंबई - महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू केलाय. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख संपली असून, तब्बल 67 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱयांवर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेना - उबाठा आणि मनसे यांनी एकत्र येत मुंबई महानगरपालिकेसाठी वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी आनंद केला व्यक्त - मुंबईतील शिवसेना भवन येथे ठाकरे बंधू यांचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आले होते. यावरुन अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनमध्ये आले - शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासून राज ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये कधीच आले नाहीत, अशी माहिती मिळत आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला. राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आले असून, याचा मला खूप आनंद झाला. दोन भाऊ एकत्र येत असल्यानं आम्हाला आनंद होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या एकत्र येण्याने राज्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
राहुल नार्वेकर यांचा राजीनामा घ्या - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करुन केली. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखं वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरु केली. बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळं राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा -
- पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकूण मालमत्ता किती?
- मुंबई महापालिका निवडणूक : गिरगावचा श्वास कोंडतोय! टॉवर्स वाढले पण नागरी सुविधा घटल्या; खोदलेले रस्ते, धूळीमुळे नागरिक हैराण
- एकच नारा म्हणत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करत नेमका कोणाला इशारा? नारायण राणेंचं आज सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन

