ETV Bharat / state

राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात कुलाब्यातील इच्छुक उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

Rahul Narwekar
फाईल फोटो - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 7:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचलाय. राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय. कुलाबा प्रभागातील इच्छुक उमेदवार बबन महाडिक यांच्यासह इतरांनी दाखल केलेली ही याचिका मंगळवारी न्यायालयापुढं तातडीच्या सुनावणीसाठी दाखल करण्यात आली. मात्र, मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना नियमित सुनावणीकरता वाट पाहण्याची सूचना केलीय.

याचिकाकर्ते बबन महाडिक यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

काय आहे याचिका? - राहुल नार्वेकरांनी आपल्या पदाचा गैरवापर करत इच्छुक उमेदवारांना अर्जच भरू न दिल्याचा मुख्य आरोप या याचिकेतून करण्यात आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करत, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून तातडीनं चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलीय. तसंच न्यायालयानं यात तातडीनं हस्तक्षेप करत येत्या पालिका निवडणुकीत कुलाब्यातून या सर्वांना निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी. तसेच निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी या सर्वांची नावं चिन्हासहित मतपत्रिकेवर समाविष्ट करण्याचे आदेश देण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आलीय. बबन महाडिक, नीरज राठोड, वैशाली गावडे, मेहबूब हुसैन, परिचय भोईर, मनोज मोरे, रखसाना शेख आणि मार्गरेट डिकोस्टा या सर्वांनी एकत्रित ही याचिका सादर केली. याबाबत याचिकाकर्ते आणि मनसे नेते बबन महाडिक आणि त्यांचे वकील आशिष गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सविस्तर माहिती दिलीय.

वकील आशिष गायकवाड यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

राहुल नार्वेकरांवरील आरोपांची चौकशी सुरू - अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा तसेच आपल्या पदाचा गैरवापर करत पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप राहुल नार्वेकरांवर करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असतानाही राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावत फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी फॉर्म भरण्यापासून रोखल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नार्वेकरांमुळे अर्ज भरण्यास न मिळालेल्या या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे याची लेखी तक्रार केलीय. या पक्ररणी आयोगाकडून महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागवण्यात आलाय. त्यानुसार या प्रकरणाची सध्या चौकशीही सुरू आहे.

bombay high court
मुंबई उच्च न्यायालय (ETV Bharat Reporter)

30 डिसेंबरला नेमकं काय घडलं? - महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या तीन प्रभागांतून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केलेत. ते अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हे देखील तिथं उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारासही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी तिथं अन्य उमेदवारही आपला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते. मात्र, अचानक पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं व धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिथं उपस्थित राहुल नार्वेकरांकडूनच पोलिसांवर दबाव आणण्यात आला व काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप या उमेदवारांसह माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. महत्त्वाच्या संविधानिक पदावर असलेल्या नार्वेकर यांचं हे वागणं पूर्णपणे असंविधानिक असल्याचा आरोप राठोड यांच्याकडून करण्यात आला.

हेही वाचा -

  1. राहुल नार्वेकर यांच्याविरोधातील तक्रार मागे; 'मी मात्र लढणार', हरिभाऊ राठोड यांचा निर्धार
  2. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून पदाचा गैरवापर करत उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांची चौकशी सुरू
  3. राहुल नार्वेकर विसरलेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, संजय राऊतांचा टोला