विधानपरिषदेत मुंबईतील बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा चर्चेला; मराठी हिंदू व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याचं प्रवीण दरेकरांचं मत
चित्रा वाघ यांनी नमूद केलं की, मुंबईतील परंपरागत व्यवसायांवर बांगलादेशी घुसखोरीचा गंभीर परिणाम होत असून स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Published : February 28, 2026 at 5:34 PM IST
मुंबई : मराठी व हिंदू समाजाच्या अस्तित्वासमोर उभ्या राहिलेल्या बांगलादेशी घुसखोरीच्या प्रश्नानं शहरात पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केलं आहे. मुंबईचा पत्ता आगरी, कोळी, भंडारी, मराठी कारागीर, हिंदू व्यापारी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी घडवला, असं सांगत आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत या घुसखोरीमुळं स्थानिकांवर होत असलेल्या परिणामांकडे लक्ष वेधलं.
घुसखोरीमुळं पारंपरिक व्यवसायांवर परिणाम : प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की, बांगलादेशी घुसखोरांनी फेरीवाला व्यवसायातून सावकार, जमीन माफिया, आधारकार्ड, पॅनकार्ड अशा बनावट कागदपत्रांच्या मदतीनं आपलं जाळं विस्तारलं आहे. त्यामुळं हॉकर्स नियमांचं उल्लंघन होऊन पदपथ, बाजारपेठा तसंच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याचा आरोप करण्यात आला. भाजी मंडई, मासळी बाजार, देह विक्री, फळ विक्री, रस्त्यावरील लघुउद्योग, छोटे हॉटेल्स, किराणा दुकानं, चांभार, लोहार, सुतार, धोबी, शिंपी यांसारख्या पारंपरिक व्यवसायांवर याचा परिणाम झाल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तर चित्रा वाघ यांनी नमूद केलं की, मुंबईतील परंपरागत व्यवसायांवर बांगलादेशी घुसखोरीचा गंभीर परिणाम होत असून स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी माणूस आणि हिंदू समाज मुंबईतील पारंपरिक व्यवसायातून बाजूला फेकला जात असून फेरीवाला व्यवसायात सावकार जाळं निर्माण झालं आहे. त्यामुळं रोजगार, सुरक्षा आणि सामाजिक वातावरण धोक्यात आले आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

एक समिती बनवावी : दरम्यान, माध्यमांशी बोलताना आमदार चित्रा वाघ यांनी सांगितलं की, "गृहराज्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती केली की बांगलादेशींबद्दल आम्ही जे मुद्दे उचलले आहे. त्यासाठी एक समिती बनवावी आणि आम्ही दिलेली माहिती त्या समितीनं वापरून बांगलादेशींच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली. बांगलादेशींची समस्या ही सामाजिक आहे, याकडे आपण कुठलाही धर्म किंवा जात वगैरे दृष्टिकोनातून पाहायला नको. गेल्या काही वर्षात बांगलादेशींची वस्ती मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये वाढत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. मुंबईचे आद्य लोक कोळी, आगरी आणि भंडारी लोकांचा परंपरागत मच्छी व्यवसाय आहे. त्याच्यावर हे बांगलादेशी मुसलमान ठाण मांडून बसत आहेत. याकडे मुंबईच्या महापौरांनी लक्ष द्यावे अशी मागणी देखील आम्ही केली आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा :

