मेळघाटात राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहनाला अपघात, पाच जण जागीच ठार
मेळघाटात भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर बारा जण गंभीर जखमी झालेत.


Published : February 22, 2026 at 11:05 PM IST
अमरावती- मेळघाटात धारणीबाजारापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव ,सुसर्दा, शिवाझीरी नारदु या रस्त्यानं प्रवास करत असलेली पिकप वाहन रस्त्यावरील खड्ड्यामुळे पन्नास फूट दरीत पलटी झाली. या अपघातात पीक अपमधील पाच प्रवासी ठार झालेत. तर दहा ते बारा जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचार करता रुग्णवाहिकेनं धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलंय.
राणीगाव गावालगत असलेल्या कंजोली गावातील नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई येथील आठवडी बाजाराकरिता राणीगाव, शिवाझीरी, सुसरदा, नारदु, झिल्पी मार्गे मध्य प्रदेशातील देडतालई येथे आठवडी बाजाराकरिता पिकअप वाहनानं 15 ते 20 जण गेले होते. तेथून बाजार आटपून येत असताना सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पिकअप वाहन राणी गाव ते शिवाझिरी घातवळणाच्या रस्त्यादरम्यान घोडादेव बाबा जवळ असलेल्या धामणनाला या ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे पिकप वाहन 50 फूट खोल दरीत पलटी झाले. त्यात कंजोली येथील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये कांजोली आणि राणीगाव येथील रहिवाशांचा समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये बाबुलाल बुडा दहीकर, सीताराम पटेल सेलुकर, किसान ताणू धांडे, सुकराई बिसराम धांडे (सर्व राहणार कांजोली, ता. धारणी) यांचा समावेश आहे.
स्थानिकांनी मदतीसाठी घेतली धाव- अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी तातडीनं रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 15 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाझिरी घाटातील रस्ता अत्यंत नादुरुस्त असून मोठ्या खड्ड्यांमुळेच अपघात झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्यानंच हा दुर्घटनेचा प्रकार घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

